गिफ्ट सिटी फक्त गुजरातला का? मुंबई, कोलकाता, लखनऊ, दिल्ली किंवा चेन्नईला का नाही? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील उद्योग आणि नोकऱ्या इतर राज्यात वळवल्या जात असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सर्व नोकऱ्या आणि संपत्ती निर्माण करणारी क्षेत्रे बळजबरीने गुजरातला नेली जात आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. गिफ्ट सिटी फक्त गुजरातला का? मुंबई, कोलकाता, लखनऊ, दिल्ली किंवा चेन्नईला का नाही? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

गिफ्ट सिटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गिफ्ट सिटी मुंबईवरून बळजबरीने गुजरातला नेण्यात आली. कोलकाता, मुंबई, लखनऊ, दिल्ली किंवा चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांना अशी गिफ्ट सिटी का मिळत नाही? जर केंद्र सरकारला देशाचा खरा विकास करायचा असेल, तर प्रत्येक राज्याला एक ‘गिफ्ट सिटी’ देऊन सर्वांना समान संधी द्यायला हवी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

अश्लील गाणी, आयटम साँग ही आपली संस्कृती नाही

दहीहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मिंधे गट आणि भाजपच्या मंचावर महिला, मुलींचा अश्लील डान्स सुरू होता. याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून यावरून टिकाटिप्पणीही सुरू आहे. याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, दहीहंडीच्या सोहळ्यात अश्लील गाणी वाजवली गेली, अंगविक्षेप करण्यात आले आणि आयटम साँग वाजवले गेले. ही आपली संस्कृती, धर्म नाही. भाजप आणि मिंधे गटाच्या मंचावर हे सुरू होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्यात हे होत असून ही कोणती संस्कृती आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. ‘डोंबिवली आणि पालघरच्या घटनांमधील हल्लेखोर एकाच मानसिकतेचे आहेत. या लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही. त्यांना तुरुंगातच टाकले पाहिजे,’ असे परखड मत न्यायालयाने शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान व्यक्त केले. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन केले.

डॉक्टरला शिवीगाळ; हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यावर हल्ला, शिंदे गटाचा पालघर शहरप्रमुख राहुल घरत पोलिसांना शरण, 17 जणांविरुद्ध गुन्हा उर्वरित आरोपींवर कारवाई कधी?

शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याने एका डॉक्टरला मारहाण केली होती. महिला डॉक्टरांवर हात उचलला होता. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कारवाई सुरुच ठेवली आहे. मात्र दुसरीकडे पालघरमध्ये अशीच घटना घडली असून तिथेही एकनाथ शिंदेंचेच गुंड आहेत. त्यांनी डॉक्टरला मारहाण केली. त्यांनाही अटक करून तुरुंगात टाकणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.