
येत्या 26 जुलै रोजी पंढरपूर मध्ये आषाढी वारीचा सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याचे देशभरातील वारकऱ्यांना वेध लागले आहेत. यावेळी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे लंडनहून येणाऱ्या दिंडीचे, 6 जूनला या दिंडीने प्रस्थान ठेवले असून 11 देशांचा प्रवास करुन एकादशीच्या सोहळ्यात हे मराठमोळे वारकरी सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राची संस्कृती असणारी पंढरपूरची वारी ग्लोबल होत आहे. लडनहून निघालेली दिंडी विठूनामाचा गजर करत युरोपातून आता भारताकडे निघाली आहे. युरोपातील वेगवेगळ्या देशात ती मुक्कम करणार आहे.
जवळपास 50 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांची ही दिंडी भारतात येणार आहे. 6 जुलैला या दिंडीचे लंडन येथून प्रस्थान झाले आहे. पंढरपूर मध्ये 25 जुलैला पहिली ग्लोबल वारी येवून दाखल होणार आहे. विशेष म्हणजे भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर, आणि पालखी घेऊन ही दिंडी लंडन मधून निघाली आहे. यावेळी 100 ढोल ताशांचा निनाद देखील झाला. याचा विश्वविक्रम ही मराठी लोकांच्या नावे लंडनमध्ये नोंदवला गेला आहे.
दरम्यान आषाढी वारीसाठी वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलै रोजी होणार आहे. आळंदीतून माऊलींची पालखी प्रस्थान ठेवेल. 33 दिवसांच्या या प्रवासानंतर हा सोहळा 8 ऑगस्ट रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटन यांनी ही माहिती दिली आहे.
या मराठी विठ्ठल भक्ताच्या संकल्पनेतून दिंडीची आयोजन
अनिल खेडकर या मराठी विठ्ठल भक्ताच्या संकल्पनेतून लंडन ते पंढरपूर या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही वारी लंडनहून दि.6 जून रोजी रवाना झाली, त्यावेळी मोठ्या संख्येने मराठी भक्त यावेळी उपस्थित होते.
देशातून करणार प्रवास
यंदा थेट लंडनमधील विंडसर येथून पंढरपूरकडे मराठी लोकांची दिंडी निघाली आहे. ही दिंडी लंडन , नेदरलँड , बेल्जियम , फ्रान्स , लक्झमबर्ग , जर्मनी , पोलड, झेक रिपब्लिक , हंगेरी , तुर्की , जॉर्जिया अशा देशांचा प्रवास करणार आहे. त्यानंतर ती भारतात दाखल होणार आहे.





























































