Lok Sabha Election 2024 : महायुतीत 7 जागांवरून तीन तिघाडा काम बिघाडा

ajit-pawar-shinde-fadnavis

राज्यात लोकसभा निवडणुकाRचा फीवर सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदानही होईल, परंतु महायुतीच्या आठ जागांवरून अजूनही तीन तिघाडा काम बिघाडा सुरू आहे. या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर महायुतीला तगडा उमेदवारच सापडलेला नाही. त्यातच महायुतीमधील भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गट या तीन पक्षांमध्ये यातील अनेक जागांवरून जुंपली आहे. तो गुंता सोडवताना भाजपसारखी महाशक्तीही थकल्याचे चित्र आहे.

दक्षिण मुंबईची जागा ही मूळ शिवसेनेचीच असल्याने मिंधे गट त्यावरील दावा सोडण्यास तयार नाही. दुसरीकडे भाजपने या जागेवरून लढण्याची तयारी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यापैकी एकाला तिकीट द्यावे अशी भाजपात चर्चा आहे. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्यासमोर महायुतीला उमेदवारच सापडलेला नाही.

नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा इच्छुक आहेत. दुसरीकडे अजित पवार गटही तिथून छगन भुजबळ यांना उतरवण्यासाठी उतावीळ आहे. या दोघांच्या भांडणात स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनीही नाशिकची जागा भाजपाला मिळावी यासाठी दबाव बनवला आहे. त्यामुळे महायुतीचा नाशिकमधला उमेदवार ठरलेला नाही.

या लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला असून शिवसेनादेखील ही जागा सोडायला तयार नाही. शिवसेनेकडून रवींद्र फाटक, नरेश म्हस्के इच्छुक आहेत, तर भाजपाकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे हा पेच कधी सुटणार असा प्रश्न आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही महायुतीला उमेदवार ठरवता आलेला नाही. तिथे लढायचे कुणी यावरून भाजपा आणि मिंधे गटात चर्चा सुरू आहे. मिंध्यांकडे माणसेच नाहीत आणि भाजपाकडे लढायला अनेक इच्छुक आहेत, पण त्यांच्याकडे हक्काची मते नाहीत अशी अवस्था झाली आहे.

सर्वाधिक चर्चा कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची आहे. पेंद्रीय मंत्री नारायण राणे त्या मतदारसंघातून लढण्याची तयारी करत आहेत तर दुसरीकडे मिंधे गटातून आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत त्या जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या जागेचा पेच वाढला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर मिंधे गट आणि भाजपा असा दोघांचाही दावा आहे. मिंधे गट कोणत्याही परिस्थितीत ठाण्याची जागा सोडायला तयार नाही. पालघरमध्ये महायुतीकडून राजेंद्र गावीत यांना उमेदवारी देणार असे संकेत महायुतीने दिले; परंतु ते भाजपच्या चिन्हावर लढणार की मिंधे गटाच्या यावरून वाद सुरू आहे. मिंधे गटाने पालघरची जागा आमचीच आहे असे सांगत गावीत आमच्याच चिन्हावर लढतील असा आग्रह धरल्याने गावितांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

सात जागांनी महायुतीतील नेत्यांना आणि इच्छुक उमेदवारांना अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ठाणे, पालघर या सात मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवारच अद्याप ठरलेले नाहीत.