
13 व्या शतकातील संत नामदेवांचे बंधू रामय्या यांची मुलगी ’नागरी’ ही परम विठ्ठलभक्त होती. त्यांच्या जन्म-मृत्यू शकाची कुठेही नोंद नाही. संत नामदेवांचा तिसरा मुलगा गोंदा यांच्या एका अभंगात संत नागरी यांचा नागी असा उल्लेख येतो. “नामयाची दासी नागी, दुसरी जनी! त्यांनी सेवा करून (वश) केला देवा” संत नागरी (नागी) यांच्या आठ अभंगरचनेचे हस्तलिखित संत सोपानदेवांच्या मठात (सासवड, पुणे) संतसाहित्याचे विश्लेषक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना मिळाले होते. या अभंगरचनेतून त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकून प्रथमच संशोधकांनी नोंद घेतली. संत नागरीने या अभंगांतून आत्मकथन केले आहे. संत नामदेवांची शिष्या असलेल्या संत नागरी यांनी आत्मकथनपर छप्पन्न कडवी असलेले आठ अभंग रचले आहेत. त्या आपल्या अभंगातून म्हणतात, “रामयाची कन्या गोरटी कोवळी! बापे बोळविली सासुरियात!!” भक्तीप्रवणतेचा ओलावा नसलेल्या सासरच्यांनी विठ्ठलदर्शनास जाऊ न दिल्याने नागरी अपेक्षाभंग झाला. वैष्णवजनांच्या दर्शनाची तळमळीने ‘प्राण जातो वेगी करावा धावणी।’ असा संत नागरीने टाहो फोडला. शेवटी त्या पंढरीनाथांच्या महाद्वारापर्यंत पोहोचल्या अन् विठ्ठलाशी पूर्णत एकरूप झाल्या. विठ्ठलाशी निष्ठा व एकरूपतेचा हा प्रत्ययच होता.



























































