मोदी सरकारमुळेच बुलेट ट्रेनला लेट मार्क, जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांचा आरोप हिंदुस्थानी मंत्र्यांनी वचन न पाळल्याची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठा गाजावाजा करून, हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून काही मोजक्याच लोकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला लेट मार्क लागला आहे. यावरुन जपानचे माजी कायदे मंत्री हिदेकी माकिहारा यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रकल्पाला झालेल्या विलंबासाठी त्यांनी मोदी सरकारलाच जबाबदार धरले आहे. विलंबाचे सर्वात मोठे कारण म्हणजे हिंदुस्थानच्या मंत्र्यांचा आडमुठेपणा, हे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माकिहारा हे बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये सुरुवातीपासून जोडलेले होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले, की हिंदुस्थानी पक्ष करारांपासून मागे हटला. स्वतःच्या हिशोबाने अटी बदलत राहिले. त्यामुळेच प्रकल्प पुढे सरकला नाही. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने माकिहारा यांचे आरोप फेटाळले आहेत.

बुलेट ट्रेन मार्गावर धावणार स्वदेशी वंदे भारत

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा वर्ष 2027 मध्ये सुरू होणार आहे. जपानकडून ‘ई-10’ प्रकारच्या अद्ययावत शिन्कान्सेन बुलेट ट्रेन वर्ष 2032मध्ये मिळतील. त्यांच्यावर काम सुरू आहे. मात्र, प्रकल्प लवकर सुरू करावा, यावर हिंदुस्थान आणि जपान या दोन्ही देशांनी सहमती वर्तविली आहे. सिग्नल यंत्रणेसाठी ऑर्डर देण्यात आल्या आहेत. यासाठी जपानच्या कुठल्याही कंपनीने ऑफर दिली नव्हती, असे परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पावर पहिली ट्रेन ही शिन्कान्सेन नव्हे तर कदाचित ताशी 200 ते 250 किमी वेगाने धावणारी हिंदुस्थानात तयार झालेली अधिक विकसित वंदे भारत रेल्वे असू शकते. यावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे.