पश्‍चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात अंत्यविधीहून परतणाऱ्या चार तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्‍चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अंत्यविधीहून बाईकवरून परतणाऱ्या चार तरुणांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री रानाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासुंदाजवळ हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघे तरुण बालागढ घाटावर एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून एकाच मोटरसायकलने मासुंदा येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान वाटेत त्यांची बाईक अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकल्यानंतर जवळच्या भिंतीवर जाऊन आदळली.

या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन गंभीर जखमी तरुणांना तातडीने रानाघाट उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असताना, वाटेतच त्यांनीही दम सोडला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. या दुर्घटनेत सबुज बिस्वास, प्रताप प्रमाणिक, अमित बिस्वास आणि सौमेन हाल्डर अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण 30 वर्षांखालील वयाचे असून राणाघाटच्या मासुंदा भागातील रहिवासी होते. मृत प्रताप प्रमाणिकचे काका विश्वजीत विश्वास यांनी सांगितले की, एका नातेवाईकाच्या अंत्यविधी आटोपून हे चार तरुण एकाच बाईकवरून घराकडे येत असताना ही घटना घडली. या अपघातामुळे मासुंदा परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.