
देशातील महागाई कमी करण्यात केंद्रातील मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे. गेल्या सात महिन्यापासून महागाईने उच्चांक गाठला असल्याने यामुळे सर्वसामान्यांना जोरदार झटका बसला असून त्यांचे महिन्याभराचे बजेट कोलमडले आहे.
रोजच्या खाण्यात लागणाऱ्या वस्तू महागल्या आहेत. यामध्ये कांदा, बटाटासह अन्य काही खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई सलग सातव्या महिन्यात वाढली आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 4.45 टक्के आहे, तर जूनमध्ये हा दर 4.38 टक्के होता. आज किरकोळ महागाईचे आकडे जाहीर करण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. खाद्यपदार्थांची महागाई म्हणजेच फूड इन्फ्लेशन जुलैमध्ये वाढून 5.52 टक्क्यांवर पोहोचले आहे. जूनमध्ये हा आकडा 5.32 टक्क्यांवर होता. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दराचे लक्ष्य 4 टक्के निश्चित केले होते, परंतु कंफर्ट झोनपेक्षा महागाई दर जास्त नोंदवला गेला आहे.
असा वाढला दर
जानेवारी – 2.74 टक्के
फेब्रुवारी – 3.21 टक्के
मार्च – 3.40 टक्के
एप्रिल – 3.48 टक्के
मे – 3.93 टक्के
जून – 4.38 टक्के
जुलै – 4.45 टक्के





























































