निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची दडपशाही; श्री विठ्ठल साखर कारखान्यावर आधी जप्ती, पाठिंबा देताच कारवाई मागे

महाविकास आघाडीचा प्रचार केला म्हणून 26 तारखेला साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर 29 तारखेला भाजपला पाठिंबा दिला आणि 4 मे रोजी जप्तीची कारवाई मागे घेतली गेली. भाजपचा 400 पारचा नारा आहे आणि तो गाठसाठी शासकीय यंत्रणांचा वाट्टेल तसा गैरवापर सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील युवा नेते, श्री विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली. बँकेकडून घेतलेल्या थकीत कर्जापोटी ही कारवाई केल्याचे बँकेचे म्हणणे होते. मात्र ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याची भावना कारखान्याच्या सभासदांमध्ये होती.

श्री विठ्ठल साखर कारखान्याचे 30 हजार सभासद आहेत. घरटी तीन व्यक्ती धरल्या तर, सुमारे एक लाख मतदार या कारखान्याशी जोडला गेला आहे. कारखान्याचा हा मतदार परंपरागत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जोडला गेलेला आहे. माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात या विठ्ठल परिवाराची निर्णायक मते आहेत. लोकसभेचे रणशिंग फुंकल्यानंतर अभिजित पाटील यांनी महाविकास आघाडीचा प्रचार मोठ्या जोमाने सुरू केला होता.

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो; 13 गावांचा भाजपला मतदान न करण्याचा निर्णय

एक्झिट पोलमध्ये माढा आणि सोलापूर हे दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी जड असल्याचे समोर आल्याने भाजपने महाविकास आघाडीतील तगडे नेते फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अभिजित पाटील हे भाजपचे पहिले लक्ष ठरले असून तत्कालीन संचालक मंडळाने घेतलेल्या कर्जासाठी विठ्ठल कारखान्याची साखर गोदामे राज्य सहकारी बँकेने सील केली.

कर्ज भरा मगच साखर गोडावून जप्तीची कारवाई मागे घेवू, अशी ठाम भूमिका बँकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. 26 एप्रिलला ही कारवाई झाली. तीन दिवसांनंतर म्हणजे 29 एप्रिलला पाटील यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपला पाठिंबा जाहीर केला. आणि 4 मे रोजी कर्जाचा एक रुपया देखील न भरता बँकेने जप्तीची कारवाई मागे घेतली.
भाजपने केलेल्या या राजकीय कारवाईमुळे कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष उफाळला असून कारखान्याच्या अध्यक्षाला बळजबरीने प्रचाराला जुंपल्याची भावना वाढीस लागली आहे.

फतव्याबाबत पुरावे दिल्यास पाच लाखांचे बक्षीस देणार! सोलापुरातील भाजप उमेदवार राम सातपुते यांना मुस्लिम तरुणाचे आव्हान

महाविकास आघाडीतील धडाडीच्या शिलेदारांची कोंडी करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी साम दाम दंड यांचा अतिरेकी वापर सुरू आहे. भाजपच्या या रडीच्या डावामुळे लोकांमध्ये युतीच्या उमेदवाराबद्दलचा रोष अधिक वाढीस लागत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. 5 मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विठ्ठल कारखान्यावर सभा आयोजित करण्यात आली आहे.