माझ्याबाबत तुमच्या मनात एवढा द्वेष का; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांना सवाल

राजकारणात वैयक्तिक टीका कुणीही कुणावर करु नये. हा असाच आहे, याची ढेरीच वाढली आहे, याच्या शर्टवर पानाचे ठिपके असतात, अशी टीका कुणीही कुणावर करु नये, असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी अजित पवारांना सवाल करत जबरदस्त टोला लगावला आहे. माझ्याविषयी एवढा द्वेष कशासाठी आहे अजित पवारांना? मला जर फोन करुन त्यांनी सांगितलं की जितेंद्र पोट वाढते आहे, हार्ट अटॅक वगैरे येईल सांभाळ. तर मला अजित पवारांविषयी आदर वाटला असता असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे मी इतका मोठा झालेलो नाही की शरद पवारांना काही समजून पक्ष फोडेन असाही टोलाही आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला.

भर पत्रकार परिषदेत माझे पोट हे व्यंग आहे हे दाखवण्याचा हिडीस प्रकार अजित पवार यांनी केला आहे. द्वेषातूनच हे सगळं आले. त्यांना माझ्याविषयी इतका द्वेष का? मी तुमचा राजकीय प्रतिस्पर्धी नाही. तुमच्या मतदारसंघाताला प्रतिस्पर्धी नाही, मी तुमच्या उंचीइतका होऊच शकत नाही याची मला कल्पना आहे. माझ्या निष्ठेबद्दल जर तु्म्हाला राग असेल तर तो राग सहन करण्याची ताकद मला परमेश्वराने दिली आहे. माननीय आर. आर. पाटील यांच्यावर जेव्हा टीका झाली तेव्हा ते 24 तास रडले होते. मी कितीवेळा ऐकून घेतले आहे की, तुझी दोन बटणे उघडी आहेत. मी शर्ट कसा घालायचा? कुठल्या रंगाचा घालायचा हे काय विचारायला जायचे का? यावर पक्ष चालतो का? म्हणूनच मी म्हटले होते कुणाच्याही व्यक्तीगत आयुष्यावर टीका करु नका, असे आव्हाड म्हणाले.

दरवेळी काहीही झाले की जितेंद्र आव्हाड. अजित पवारांना दुसरे नाव सापडत नाही का? मी छोट्या समाजातला आहे, त्याला टपली मारली तर काय होते? तसे नाही होत. मला विचारले लोकांनी तुझ्या पक्षात तुझ्या ढेरीबद्दल बोलले जाते. युद्ध वैचारिक असले पाहिजे. मी आजवर 32 वर्षांच्या राजकारणात कोणवरही व्यक्तिगत टीका केली नाही, असे आव्हाड म्हणाले.

पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापण्यात आला तेव्हा अजित पवारांवर आरोप झाला होता तेव्हा त्यांची बाजू घेणारा जितेंद्र आव्हाड होता. 70 हजार कोटींचा घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा 10 दिवस टीव्हीवर किल्ला लढवणारा माणूस जितेंद्र आव्हाड होता. जेव्हा तुमच्या बंगल्यांविषयी चर्चा झाली तेव्हा टीव्हीवर जाऊन बॅटिंग करणारा जितेंद्र आव्हाड होता. मी कुठे चुकलो दादा मला सांगा? होय मी शरद पवारांबरोबर आहे, मी त्यांच्याच बरोबर राहीन आणि मरेनही. मात्र मी अजित पवारांच्या व्यक्तिगत आयुष्यात कधीही काहीही बोललो नाही. अजित पवार पहिल्या भाषणात माझ्यावर बोललात, त्यानंतर प्रत्येकवेळी माझ्यावर बोललात. मी इतका मोठा नाही की शरद पवारांना काही समजून पक्ष फोडू शकतो. तुमचा समज-गैरसमज महाराष्ट्र ऐकणार नाही, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.