
केंद्र सरकारकडून सूडाचे राजकारण केले जात असून विरोधी पक्षांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री जाणीवपूर्वक विरोधकांमध्ये फूट पाडत असून, सध्याचे एनडीए म्हणजे नॅशनल डिफेक्टर अलायन्स बनले असल्याची टीका रमेश यांनी केली आहे. अमर उजालाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ANI शी संवाद साधताना जयराम रमेश यांनी १७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत घडलेल्या एका घटनेचा संदर्भ दिला. या दिवशी सरकारने घटनादुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक संमत करण्यासाठी मांडले होते. मात्र घटनादुरुस्ती विधेयकावरील मतदानात सरकारला दोन तृतीयांश बहुमत मिळवता आले नाही. सरकारच्या बाजूने केवळ २९८ मते पडली, तर विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात २३० मते नोंदवली. जयराम रमेश म्हणाले आहेत की, या पराभवामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. संपूर्ण ताकद पणाला लावूनही आवश्यक आकडा न गाठता आल्याने हा गृहमंत्र्यांचा मोठा अपमान असल्याचे ते म्हणाले. १६ एप्रिल रोजीही याच अपेक्षेने विशेष अधिवेशन बोलावले होते, पण विरोधकांच्या एकजुटीमुळे सरकारला केवळ २९८ मतेच मिळवता आली.
लोकसभेत आणि राज्यसभेत आपले संख्याबळ वाढवण्यासाठी आता सरकार इतर पक्षांना फोडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी दोन तृतीयांश बहुमत मिळवून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा गृहमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप रमेश यांनी केला. याच पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत, असेही ते म्हणाले.
विरोधकांची एकजूट तोडण्याचे आणि राज्यसभेतही खासदारांना राजीनामे द्यायला लावून भाजपमध्ये सामील करण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, सरकारला कोणत्याही परिस्थितीत दोन तृतीयांश बहुमत मिळणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले आहेत.


























































