लोकांच्या हिताची गोष्ट असते तिथे तुम्ही शांत बसता आणि… रोहित पवारांची छगन भुजबळांवर टीका

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक होऊ लागले असून त्यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा या जरांगे पाटील यांच्या मागणीला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. दरम्यान, बीडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या आवाहनावरून रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसी एल्गार सभेचं आयोजन केलं होतं. बीडमधील दगडफेक आणि जाळपोळीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत भुजबळ यांनी ओबीसी समुदायाला एल्गार सभेला येण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींसमोर न मांडल्याबाबत भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात आले होते. नाशिकमध्ये त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळही हजर होते. देशातला इतका मोठा नेता आपल्याकडे आल्यावर तुम्ही आपले विषय त्यांच्यापुढे मांडायला हवे होते. केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी ईडब्ल्यूएस कोटा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा विषयदेखील पंतप्रधानांपुढे मांडायला हवा होता, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, जिथे लोकांच्या हितासाठी बोलायचं तिथे तुम्ही शांत बसता आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करायची असेल तर घसा कोरडा होईपर्यंत बोलता आणि ट्वीट करता. त्यामुळे मला असं वाटतं की, त्यांनी उगाच राजकारण करू नये. पंतप्रधान आल्यावर तिथे बोलायची तुमची हिंमत होत नाही आणि इथे येऊन तुम्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहात. असं करून तुम्ही राज्यातल्या मुख्य विषयांना बगल देताय. राज्यात बेरोजगारीचा विषय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ते तुम्ही बाजूला ठेवत आहात. त्यामुळे तुम्ही हे राजकारण थांबवा आणि मुद्द्याचं बोला, असं आमचं मत आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.