मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यावर चर्चा सुरू असून मनोज जरांगे जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का, अशा चर्चा होत आहेत. आता त्यावर मनोज जरांगे यांनीच प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हे उपोषणानंतर सध्या बीड येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. मनोज जरांगे निवडणूक लढवणार का, याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच जरांगे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सध्या माझे पूर्ण लक्ष हे मराठा आरक्षणावर आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही. मराठ्यांची लेकरे मोठी व्हावी, यासाठी माझी झुंज चालू आहे. माझ्यासाठी समाज हा सर्वात मोठा आहे. मी माझ्या समाजासाठी काम करत राहीन, लढत राहीन.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी 10 टक्के आरक्षण मान्य करायला तयार आहे. परंतु, ते आरक्षण ओबीसीतून द्या. राज्य सरकारने देऊ केलेलं 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मी स्वीकारावे यासाठी हे सरकार माझ्यामागे चौकशा लावत आहे. परंतु, मी या गोष्टींना जुमानत नाही. आमच्या मुलांना केंद्रात सवलती मिळाल्या पाहिजे. माझा लढा फक्त मराठा समाजासाठी आहे आणि त्यांच्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे. माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. सरकारने सगेसोयऱ्यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. सरकारने लोकांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नये,असेही जरांगे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मराठा आंदोलनावरील टीकेलाही जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं. जरांगे पाटील म्हणाले, फडणविसांनी मला अडकवण्याचे प्रयत्न केले तरी मी लढत राहणार. त्याचबरोबर सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून मी मागे हटणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावे लागते आणि आम्ही ते सिद्ध केले आहे. शासकीय अहवालदेखील तेच सांगतोय. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मागे घ्या, असेही जरांगे म्हणाले.