श्रीलंकेने टीम इंडियाचा पराभव केला; 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी भडकला, मैदानावरच राडा; नेमकं काय झालं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया A आणि श्रीलंका A यांच्यामध्ये तिरंगी मालिकेतील चौथा सामना आज (15 जून 2026) खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत सामना खेचून आणण्याचा प्रयत्न केला. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि अखेर श्रीलंकेने बाजी मारली. मात्र, टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये वाद झाला. यावेळी वैभव सूर्यवंशी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. यामुळे काही काळ मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 265 धावा केल्या आणि श्रीलंकेला जिंकण्यासाठी 266 धावांचे आव्हान दिले होते. सूर्यांश शेडगे (72) आणि विपराज निगम (51) यांनी सर्वाधिक धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 9 गडीबाद 265 धावा करत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याने सर्वाधिक 93 धावांची खेळी केली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने 16 धावा करत टीम इंडियाला 17 धावांचे आव्हान दिले. मात्र, टीम इंडिया आव्हानाचा पाठलाग करण्यात अयशस्वी ठरली आणि श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला.

दरम्यान, सामना संपल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीला डिवचल्याच म्हटलं जात आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी चांगलाच खवळलेला पाहायला मिळाला. इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत वैभवला लांब नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ मैदानात गरमागरमीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नेमकं दोघांमध्ये काय झालं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.