
कर्नाटकचे गृहमंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना खुले पत्र लिहून संघाच्या आर्थिक व्यवहारांपासून ते कायदेशीर दर्जापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संघाने आपल्या संघटनेची नोंदणी करावी, उत्पन्न, खर्च, निधीचे स्रोत जाहीर करावेत आणि कर भरावेत. तसेच संघटना कोणत्या कायदेशीर चौकटीत कार्य करते याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा देतानाच खर्गे यांनी संघाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि देशभरातील व्यापक कार्यामुळे सार्वजनिक उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रसिद्ध केले.
संघाच्या वार्षिक अहवालाचा हवाला देत खर्गे यांनी म्हटले की, कर्नाटकमध्ये आरएसएसच्या 4,127 दैनिक शाखा, 1,389 साप्ताहिक बैठका (मिलन) आणि 60 मासिक स्वयंसेवक मेळावे (मंडळी) आयोजित केले जातात. याशिवाय 2,194 समाजोत्सवांमध्ये 19.6 लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते, तर 562 पथसंचलनांमध्ये 2.2 लाखांहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवक सहभागी झाले होते.
इतक्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रम, पथसंचलने आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संघटनेकडे केवळ खासगी किंवा अनौपचारिक संस्था म्हणून पाहता येणार नाही, असे खर्गे यांनी म्हटले. संघटनेचा विस्तार आणि प्रभाव लक्षात घेता तिच्या आर्थिक व्यवहारांबाबत, निधीच्या स्रोतांबाबत आणि कायदेशीर स्थितीबाबत प्रश्न विचारले जाणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले.
खर्गे यांनी संघाला त्याचा कायदेशीर दर्जा, संघटनात्मक रचना, प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती, देणग्या आणि इतर उत्पन्नाचे स्रोत, खर्च, मालमत्ता, कर भरण्याच्या नोंदी तसेच संघ औपचारिक नोंदणीशिवाय कार्यरत असेल तर त्यामागील कायदेशीर आधार सार्वजनिक करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच पथसंचलने, सार्वजनिक कार्यक्रम आणि मोठ्या सभांसाठी प्रशासनाकडून कोणत्या परवानग्या घेण्यात आल्या याची माहितीही जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
“लोकशाही व्यवस्थेत कोणतीही संस्था कितीही जुनी, मोठी किंवा प्रभावशाली असली तरी ती सार्वजनिक तपासणीपासून दूर राहू शकत नाही,” असे खर्गे यांनी पत्रात म्हटले आहे. ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था आणि कंपन्यांना जशी आर्थिक आणि प्रशासकीय माहिती जाहीर करावी लागते, त्याच निकषांवर आरएसएसलाही उत्तरदायी असावे लागेल, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीयत्व, शिस्त आणि कर्तव्य यांवर भर देणाऱ्या संघटनेने स्वतःही पारदर्शकतेचे उदाहरण घालून द्यावे, असे सांगत खर्गे म्हणाले, “सामान्य नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा करणारा आरएसएस स्वतःला त्या नियमांपासून वेगळे ठेवू शकत नाही.”
आरएसएसच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख करत त्यांनी हे वर्ष “घटनात्मक आत्मपरीक्षणाची संधी” असल्याचे म्हटले. संघाने औपचारिक नोंदणी करावी, आर्थिक व्यवहार आणि उपक्रमांची माहिती सार्वजनिक करावी, लागू असलेले सर्व कर भरावेत आणि कायद्याच्या चौकटीत पारदर्शक व उत्तरदायी संस्थेप्रमाणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, याच विषयाशी संबंधित आणखी एका वादावरही खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली. केरळमधील काही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी संघाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याबद्दल माफी मागावी, या मागणीचे त्यांनी समर्थन केले. विशिष्ट विचारसरणीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये विद्यापीठ प्रमुख सहभागी होत असतील, तर त्यातून विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी कुलगुरूंवर असते. अशा पदावरील व्यक्तींनी संघाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन न देणाऱ्या विचारसरणीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे योग्य आहे का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Dear Shri Mohan Bhagwat ji,
My letter will reach you shortly. However, I thought it was important to draw your attention to this matter early.
——————————-Firstly, congratulations to the RSS on completing 100 years.
An organisation that claims over 60,000 shakhas and crores of… pic.twitter.com/IZy4oeKdMp
— Priyank Kharge / ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ (@PriyankKharge) June 15, 2026



























































