
झुरळ म्हणून हिणवल्या गेलेल्या जेन-झींचे आंदोलन मोदी सरकारला महागात पडले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भाजपला दुसरा दणका बसला आहे. मध्य प्रदेशातील दतिया आणि बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्यात जन सुराज पक्षाचे प्रशांत किशोर विजयी झाले आहेत. तर, दतियाची जागा काँग्रेसने जिंकली आहे.
नितीन नबीन यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भाजपने नीरज कुमार यांना संधी दिली होती. मात्र त्यांचा 19 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव झाला. प्रशांत किशोर यांना 64,151 तर, नीरज कुमार यांना 44,827 मते मिळाली. दतिया येथे काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचा पराभव करत ही जागा राखली. नीट पेपरफुटीच्या मुद्दय़ावर विद्यार्थ्यांनी केलेल्या उग्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली होती. या आंदोलनामुळे जनसामान्यांमध्ये निर्माण झालेल्या रोषाचा फटका भाजपला बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘हा फक्त माझा विजय नाही. बांकीपूरच्या जनतेचा विजय आहे. बिहारमध्ये सक्षम मुख्यमंत्री बसवा हा संदेश जनतेने दिला आहे. भाजपच्या पेंद्रीय नेतृत्वाला आणि पंतप्रधान मोदींनाही हा इशारा आहे’, अशी प्रतिक्रिया जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी दिली.
ते म्हणत होते, कुत्री-मांजरेही निवडून येतील!
बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांनी उमेदवारी जाहीर केली तेव्हा भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. बांकीपूरमधून कुत्र्या-मांजराला उमेदवारी दिली तरी ते जिंकून येतील असं ते म्हणाले होते. प्रशांत किशोर यांनी निवडणूक प्रचारात हा मुद्दा लावून धरला होता. लोकांनी भाजपला धूळ चारून आपला राग व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा!
विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा! असा इशारा त्यांनी दिला.




























































