
सरकार जलसंधारण आणि जलयुक्त शिवार योजना केल्याची टिमकी मिरवत असताना प्रत्यक्षात सात ते आठ हजार गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ का आली आहे? राज्यात भीषण पाणीटंचाई का निर्माण झाली आहे, असा सवाल करीत मोहित कंबोजला विचारल्याशिवाय जलसंपदा, जलसंधारण खात्याचे पानही हलत नाही. ही खातीच कंबोज चालवत आहे, असा आरोप विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला. यावेळी सत्ताधाऱ्यांनी आगपाखड केली.
राज्यातील पाणीटंचाईवर बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारच्या जलसंपदा आणि जलसंधारण खात्याच्या अपयशावर कडक ताशेरे ओढले. सरकार जलसंधारण आणि जल शिवार योजनेत मोठे काम केल्याचे सांगते, मग आज राज्यात पाणीटंचाई का निर्माण झाली आहे, असा सवालही त्यांनी केला. जलयुक्त शिवार, जलसंधारणची कामे केल्याचे सांगता, मग टँकरची कंत्राटे आपल्या लोकांना देण्यासाठी काढली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांच्यावर त्यावेळी या खात्यात 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मग आता त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला.
यांचा कोण लागतो मोहित कंबोज?
अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचे ऑडिओ पुरावेच आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोटही दानवे यांनी केला.या खात्यांच्या कोणत्याही अधिकाऱयाला विचारणा केल्यास ते मोहित कंबोजला फोन करायला सांगतात असेही ते म्हणाले. यावेळी सत्ताधाऱयांनी आरडाओरडा करीत दानवे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. यावर ‘मोहित कंबोज तुमचा कोण लागतो?’, असा सवाल दानवे यांनी उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी बाहेरील व्यक्तीचे नाव घेऊ नका, असा आक्षेप सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात आला. याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत दानवे यांनी सत्ताधाऱयांचा समाचार घेतला.


























































