पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नाही, आमचा हेडमास्तर लई खमक्या; जयंत पाटील यांची टोलेबाजी

सर्वांनी अनेक शाळा पाहिल्या आहेत. पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद पडत नाही.  पुन्हा नव्याने पोरं घडवण्याचे काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो. आमचा हेडमास्तर लई खमक्या आहे. शरद पवार म्हणजे  मतांचा विषय नाही तर तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अजित पवार गटावर तुफान टोलेबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार हे सर्वांच्या काळजातील विषय आहे, हे मी महाराष्ट्रातील गावागावात गेल्यावर पाहतो  आहे. निवडणूक प्रचारातील जयंत पाटील यांच्या भाषणाला तुफान प्रतिसाद सध्या मिळत आहे.

 महाविकास आघाडीच्या 35 जागा येतील

मराठी माणसाने स्थापन केलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडण्याचे पाप भाजपने केले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात चीड, संतापाची भावना आहे. मतदानातून ही भावना व्यक्त करण्यासाठी ही भावना व्यक्त करण्यासाठी जनता सज्ज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे 32 ते 35 जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.