IRCTC तात्काळ तिकीट बुकिंग सेवेत तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे प्रचंड हाल, सोशल मीडियावर संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग ॲपवर (IRCTC) तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेतर्फे ‘तत्काळ तिकीट’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या तिकिटांचे आरक्षण प्रवासाच्या एक दिवस आधी सुरू होते आणि ते ‘आधी येणाऱ्यास प्राधान्य’ (First Come, First Served) या तत्त्वावर केले जाते. विशेष म्हणजे, एकदा तिकीट कन्फर्म झाले की ते रद्द केल्यास कोणताही परतावा (Refund) मिळत नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक प्रवाशांना ही तिकिटे बुक करणे शक्य झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीच्या ॲपवर नॉन-एसी गाड्यांसाठी सकाळी 11वाजता तात्काळ बुकिंग सेवा सुरू करण्यात आली. मात्र, काही वेळातच वेबसाइट आणि ॲप पूर्णपणे कोलमडले. बुकिंग सुरू होताच ॲप हँग होणे किंवा ‘नॉट फाउंड’ (Not Found) असे संदेश दिसणे, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक प्रवाशांच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले, परंतु तिकीट मात्र बुक झाले नाही. अवघ्या काही मिनिटांतच सर्व सीट्स संपून ‘रिग्रेट’ (REGRET) असा संदेश दिसू लागल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेटकऱ्यांनी या भोंगळ कारभारावर सोशल मीडियावर सडकून टीका केली आहे. जगाला आयटी सेवा देणाऱ्या देशात रेल्वेचे स्वतःचे बुकिंग पोर्टल नीट चालत नाही, अशा शब्दांत एका युजरने नाराजी व्यक्त केली. काहींनी हा मोठा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला असून, जर पारदर्शक आणि सुरळीत सेवा देता येत नसेल, तर ही यंत्रणा कायमची बंद करा, अशी मागणीही केली आहे. सामान्य प्रवाशांऐवजी एजंट किंवा ‘बॉट्स’चा (Bots) या यंत्रणेवर ताबा आहे का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

या सर्व प्रकारावर स्पष्टीकरण देताना आयआरसीटीसीने ही केवळ एक ‘तात्पुरती तांत्रिक अडचण’ असल्याचे म्हटले आहे. प्रवाशांनी ॲपची ‘कॅश मेमरी’ (Cache) क्लिअर करावी, ॲप अपडेट करावे किंवा पुन्हा इन्स्टॉल करून पाहावे, असा सल्ला रेल्वेने दिला आहे. तसेच ज्यांचे पैसे कापले गेले आहेत, त्यांनी डिव्हाइसची माहिती आणि तांत्रिक तपशिलासह सविस्तर तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या या बिघाडांमुळे रेल्वेच्या डिजिटल क्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.