
सीईटीसंदर्भात एसआयटी आजच स्थापन केली आहे. सीईटीबाबत जेवढय़ा तक्रारी असतील त्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
पेपरफुटीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, फॉरेन्सिक ऑडिटही केले जाणार. कुठेही गडबड निघाली तर फौजदारी कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमपीएससीच्या संदर्भात जी समिती तयार झाली आहे त्याच्या अध्यक्षांनी जे म्हटले त्याचा विपर्यास करण्यात आला. त्यांनी कुठेही ऑनलाईन परीक्षा घेऊ असे म्हटलेले नाही. आता तरी कुठेही ऑनलाईन घेण्याचा विषय नाही. कुठल्याही परीक्षा ऑनलाईन नाही. आहे त्या परिस्थितीतच परीक्षा होतील. कुठलाही निर्णय विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.




























































