पुराचे पाणी घरात शिरल्यास 10 हजार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

पुराचे पाणी घरात शिरल्यास दहा हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असून त्याचा लाभ दुकाने आणि टपरीधारकांनाही मिळेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात केली. 

यापूर्वी पुराचे पाणी घरात शिरून नुकसान झाल्यास पाच हजार रुपये भरपाई दिली जात होती. ती रक्कम दुपटीने वाढवली गेली आहे, असे अजित पवार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सांगितले. पूरस्थितीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी, असे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत. 

राज्यातील पूरस्थितीबाबत अजित पवार यांनी आज विधिमंडळात निवेदन केले. राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत देता येत नसली तरी अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी गेल्या वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. राज्यातील पूरस्थिती आणि अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी 25 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांशी ऑनलाइन संपर्क साधला जाईल असे अजित पवार म्हणाले. 

  • शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करणार 
  • धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणार 
  • बाधितांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप त्याच दिवशी व्हावे यासाठी पुरेसा धान्य पुरवठा करण्याचे निर्देश 
  • रोगराई टाळण्यासाठी स्वच्छता, जंतुनाशक फवारणी 
  • पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा 
  • पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या तातडीच्या दुरूस्तीचे आदेश 
  • पुरामुळे शैक्षणिक साहित्य खराब झाले असेल तर विद्यार्थ्यांना तातडीने नवे साहित्य देणार
  • पूरस्थितीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी
  • स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करावे