
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. मुंबईहून उड्डाण घेतलेल्या त्यांच्या विमानाला बारामती येथे भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर अजित पवार यांनी पहिला फोन आपल्याला केला होता, अशी आठवणही सांगितली.
संजय राऊत म्हणाले की, जेव्हा जेव्हा शरद पवारांबरोबर बैठका व्हायच्या तेव्हा अजित पवार उपस्थित असायचे. अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली त्याच्या आदल्या दिवशी अकरापर्यंत आम्ही एकत्र होतो. अकरा वाजल्यानंतर शोधाशोध करताना ज्या घडामोडी घडल्या त्या रंजक होत्या. तिथपासून सरकार बनवताना अजित पवार यांची सोबत महत्त्वाची होती. जेव्हा सरकार बनले आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा अजित पवारांनीही शपथ घेतली. त्यानंतर ते मंत्रालयात गेले आणि पहिला फोन मला केला होता. महाविकास आघाडीचे सरकार बनवताना आपण जे कष्ट घेतले त्याचे स्मरण आम्हाला कायम राहील, अशा प्रकारचे वक्तव्य त्यावेळी केले होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.
अजित पवारांनी नवा मार्ग स्वीकारला तेव्हा आम्ही टीकेचा बाण सोडत राहिले. पण त्यांनी क्वचित उत्तर दिले. ते शांत राहून काम करत राहिले. राजकारणामध्ये अशी माणसं दुर्मिळ असते. अत्यंत उमद्या वयात ते गेले. त्यांच्याकडून अजून बरेच काम महाराष्ट्राला करून घेता आले असते. राजकारणात ते मोठी खेळी अद्याप खेळू शकले असते, असे संजय राऊत म्हणाले.
अलिकडेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले. काका आणि मुला समान पुतण्याने एकत्र राजकारण सुरू केल्याचा आनंद सगळ्यांना झाला. आताही जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ आणि तुतारी एकत्र लढत आहेत, त्याचा आनंद होता. पण तो आनंद फार काळ टिकला नाही, असे राऊत म्हणाले.
राजकारण कोणत्याही थराला गेले तरी पवार कुटुंब अभेद्य, एकत्र कायम राहिले. अनेक प्रसंगात ते दिसले. त्याच्यामुळे पवार कुटुंबावरचा हा सगळ्यात मोठा आघात आहे. सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार लढल्या, अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवार लढले, रोहित पवार यांनी काही टीका टिप्पणी केली तरी सामाजिक कार्यात, कौटुंबिक सोहळ्यात पवार कुटुंबाचे ऐक्य आदर्श प्रकार राहिला. अजित पवार हे त्या कुटुंबातील शरद पवारानंतर कर्ते पुरुष होते. अशा कर्त्या पुरुषाचे जाणे यासारखी दुखत आणि धक्कादायक गोष्ट नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.


























































