
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पारा 42 अंशांच्या आसपास पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत बाहेर फिरताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी विशेष काळजी घ्यावी. यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘उष्माघात कक्ष’ सुरू केले आहेत.
आज दुपारी सांगली शहरासह जिल्ह्याचा पारा 42 अंशांवर होता. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने 42 ते 45 अंशांच्या घरात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे उष्माघात होण्याचा धोका वाढतो.
या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘उष्माघात कक्ष’ सुरू केले आहेत. या कक्षांमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र बेड, थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पंखे तसेच आवश्यक औषधसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरज भासल्यास तातडीने उपचार देण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
उष्माघाताची लक्षणे
डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे, उलट्या होणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे, घाम फुटणे, बेशुद्ध पडणे, जास्त प्रमाणात चिडचिड होणे, श्वास घेण्यास त्रास होणे.
अशी घ्या काळजी
घराबाहेर पडताना डोक्याला टोपी, अंगात सुती आणि पांढरे कपडे घालावेत. पाण्याची बॉटल सोबत बाळगा. सतत पाणी प्या. पाण्याचा स्रोत असलेल्या फळांचे सेवन करावे. जास्त वेळ उन्हात काम करणे टाळा. उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे टाळा. अति व्यायाम करू नका. वृद्ध, सहव्याधी असलेल्यांनी उन्हात घराबाहेर पडणे टाळावे.




























































