मतदारसंघ पुर्नरचना विधेयकासाठी फोडाफोडी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा अमित शहांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये सामील करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय मोहीम राबवली जात असल्याचे म्हटले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी गृहमंत्र्यांवर लोकशही संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत जोरदार टीका केली.

जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयके (Delimitation Bill 2026) मंजूर करून घेण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अपयश आले होते. त्या घटनेमुळे झालेल्या राजकीय नामुष्कीची भरपाई करण्यासाठी ते आता विरोधी पक्षांवर आक्रमक भूमिका घेत आहेत.

केवळ दोन वर्षांपूर्वी भाजपविरोधी भूमिका आणि विचारसरणीच्या आधारे जनतेने निवडून दिलेल्या काही लोकप्रतिनिधींना आता भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जात आहेत, असे रमेश म्हणाले. या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या ऑफर आणि राजकीय लाभांचे स्वरूप अत्यंत धक्कादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री सध्या पूर्णपणे राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून एक सुनियोजित मोहीम राबवत असल्याचा आरोप करत रमेश यांनी या प्रक्रियेची तुलना म्युच्युअल फंड उद्योगाशी केली. म्युच्युअल फंड कंपन्या जशा वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार विविध योजना आणि उत्पादने उपलब्ध करून देतात, त्याचप्रमाणे प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या राजकीय, वैयक्तिक किंवा अन्य गरजांचा विचार करून त्यांना वेगवेगळी प्रलोभने दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

ही मोहीम अत्यंत व्यवस्थितपणे आणि मोठ्या प्रमाणात संसाधनांचा वापर करून राबवली जात असल्याचेही रमेश यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्व प्रकारची साधने वापरली जात असून या प्रक्रियेत कोणत्याही नैतिक मर्यादा पाळल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

जयराम रमेश यांनी गृहमंत्र्यांवर भारतीय लोकशाहीची हानी केल्याचाही आरोप केला. विरोधी पक्ष कमकुवत करणे, त्यांच्यात फूट पाडणे आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवणे हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे त्यांनी म्हटले. अशा प्रकारच्या राजकारणामुळे मतदारांनी दिलेल्या कौलाचाही अनादर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यांच्या अंतिम राजकीय उद्दिष्टात यश मिळणार नाही, असा विश्वास जयराम रमेश यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देत राहतील आणि जनतेचा विश्वास कायम राखतील, असेही त्यांनी सूचित केले.