
भाजपाच्या राज्यात लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी, पैसा फेक, तमाशा देखचा खेळ लोकशाहीस अत्यंत घातक आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “भारतीय जनता पक्षाने लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवत, हम करे सो कायदा, या पद्धतीचा तुघलकी कारभार सुरु केला आहे. सत्ता, सत्ता आणि सत्ता हेच त्यांचे ध्येय असून मागील काही वर्षात निवडणुका म्हणजे पैसा फेक, तमाशा देखचा खेळ सुरु आहे. निवडणुकीत विजय मिळाला नाही तर विजयी उमेदवारांना पैशाच्या जोरावर विकत घ्यायचे, नाहीतर निवडणुक आयोगाला हाताशी धरून उमेदवारीच रद्द करायची, असा अत्यंत विकृत कारभार सुरु झाला आहे. हे सर्व प्रकार लोकशाहीस घातक आहेत पण सर्वात दुर्दैवी म्हणजे या सर्व घटनांना विधिमंडळ, संसद व न्यायालय, कुठेही न्याय मिळत नाही ही शोकंतिका आहे. सर्व संस्थांवर भाजपाने कब्जा केला असून दहशतीच्या जोरावर राज्यकारभर सुरु आहे,.”




























































