
तामीळनाडू विधानसभेत सोमवारी आरोग्य व महसूल विभागांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा सुरू असताना एका मंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा गदारोळ उडाला. राज्याचे वनमंत्री आर. व्ही. रंजित कुमार यांनी आपल्या भाषणात तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे दिवंगत ज्येष्ठ नेते एम. करुणानिधी यांचा उल्लेख कोणत्याही आदरातिथ्याशिवाय किंवा पदवीशिवाय थेट नावाने केला. यावरून विरोधकांनी विधानसभेत तीव्र आक्षेप घेत जोरदार गदारोळ घातला. अखेर वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री विजय यांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी सर्वांची माफीही मागितली.
अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना मंत्री रंजित कुमार यांनी भूतकाळातील निवडणुकांमधील गैरप्रकारांवर टीका केली. कुप्रसिद्ध थिरुमंगलम फॉर्म्युला आणि रोख रकमेच्या बदल्यात मते घेण्याच्या पद्धतींवर निशाणा साधताना त्यांनी दावा केला की, पूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या कांचीपुरम मतदारसंघात प्रति मत 1500 रुपयांपर्यंत वाटप केले गेले होते. सध्याचे सरकार कोणत्याही प्रकारे पैशांचे वाटप न करता सत्तेवर आले आहे, असा दावा करत त्यांनी भूतकाळातील आणि सध्याच्या प्रशासनातील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, हे दाखले देताना त्यांनी द्रमुकचे दिवंगत सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असे न करता थेट करुणानिधी असा केला. तामीळनाडू विधानसभेच्या परंपरेनुसार आणि शिष्टाचारानुसार ज्येष्ठ व आदरणीय नेत्यांचा उल्लेख सन्माननीय पदवीसह करण्याची जुनी प्रथा आहे. या प्रथेचा भंग झाल्याचे दिसताच माजी मंत्री के. के. एस. एस. आर. रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवत गदारोळ सुरू केला.
मुख्यमंत्र्यांचा माफीनामा
सभागृहात वाढता वाद आणि तणाव पाहून मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी मंत्र्यांचे भाषण मध्येच थांबवत, दिवंगत नेत्याचा अशा प्रकारे उल्लेख करणे अयोग्य असल्याचे मान्य केले. मी त्यांच्या वतीने सभागृहाची आणि सर्वांची क्षमा मागतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री विजय यांनी केले. त्यामुळे विधानसभेतील गोंधळ कमी झाला आणि पुढील कामकाज सुरळीत सुरू झाले.





























































