फडणवीसच सरकारचे हायकमांड, कोणाला सोबत ठेवायचं आणि कधी सोडायचं हे त्यांना कळतं

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा येथील पक्षाच्या एका बैठकीत एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भाजप आता शिंदे गटाचा वापर करून त्यांना सोडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी या सरकारची सगळी सूत्र ही देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहेत, हे देखील स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेशी बेईमानी करून शिंदे गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केलं. या सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच अजित पवार आमदारांचा मोठा गट सोबत घेऊन सरकारमध्ये सहभागी झाले. दोन दिवसांपूर्वी या सरकारमधील मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आले. यावेळी शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. सरकारमध्ये बहुमत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून घेतल्याने शिंदे गटातील आमदार अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, साताऱ्यात भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे उपस्थित होते. या बैठकीत जयकुमार गोरे म्हणाले की, “राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. त्यांना माहिती आहे की, कोणाला बरोबर घ्यायचं आणि कधी सोडायचं? भाजपने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं?

आमदार गोरे यांच्या वक्तव्यावरून भाजप आता शिंदे गट आणि अजित पवार गटाचा वापर करून त्यांना सोडणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.