
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात मागील आठवड्यात कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी 12 एप्रिल रोजी तीन दुचाकींवरून दोन जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक केली. गंगाधर बुरांडे, मोरेश्वर देवतळे, ओम शिंदे, हेमचंद शेंडे, धवल वेलादी आणि राजेंद्र दिवसे अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींचे मोबाईल तपासले असता वनअधिकाऱ्यांना जबर धक्का बसला. या मोबाईलमध्ये वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग आढळले. स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ चित्रीकरण, घुबड आणि कासवांचे फोटो, तसेच अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या खासगी अवयवांचे फोटोही हाती लागले आहेत. काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही आरोपींनी ठेवली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील चिमूर, पोंभुर्णा आणि चामोर्शी अशा ग्रामीण भागांत पसरलेले आहे. या रॅकेटमध्ये जवळपास 50 मध्यस्थ कार्यरत असून ते ‘शिकार’ शोधण्याचे काम करत होते. हे मध्यस्थ महिलांच्या जन्मकुंडल्या आणि त्यांचे व्हिडिओ मुख्य मांत्रिकाकडे पाठवितात. या वर्तुळात मांत्रिकाला ‘टेस्टर’ म्हटले जात होते. एखादी महिला किंवा प्राणी अघोरी पूजेसाठी ‘योग्य’ आहे की नाही, हे हा टेस्टर ठरवत असे. त्यानंतर निर्जन स्थळी किंवा स्मशानभूमीत अघोरी विधी पार पाडले जात होते. पैशाचा पाऊस पाडणे आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही स्तरांतील लोकांना फसवले जात होते.
आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता, मात्र वनविभागाच्या छाप्यादरम्यान ती बिस्किटे बनावट असल्याचे उघड झाले. सध्या सर्व सहा आरोपी वनकोठडीत असून, मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक आणि महाराज अद्याप फरार आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने लवकरच हा तपास पोलिस विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. घुबड आणि कासव यांचा संबंध आपल्या पुराणांमध्ये धनसंपत्तीशी जोडला जातो. त्यामुळे अघोरी पूजेत त्यांचा वापर केला जातो. विधवा महिला आणि कुमारिका या मांत्रिकांचे सहज सावज ठरतात. त्यांच्या पाठीशी कुणी नसल्याने त्यांचे शोषणही पूजेच्या निमित्ताने केले जाते, अशी माहिती अंनिसचे कार्यकर्ते हरीभाऊ पाथोडे यांनी दिली.
या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या या विळख्यात अजून किती महिला अडकल्या आहेत, याची धक्कादायक माहिती तपासाअंती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मांत्रिकापर्यंत पोहचणाचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान या प्रकरणात गुरुवारी आणखी दहा जणांना ताब्यात घेतले आहे.




























































