
‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेअंतर्गत पालिकेच्या माध्यमातून ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. वरळी एनएससीआय डोममध्ये आयोजित कार्यक्रमात पालिकेच्या तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी ‘अमली पदार्थमुक्ती’ची शपथ घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, पथनाटय़ही सादर केले.
या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या युवा शक्तीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून भारताला आतून कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. ड्रग्स हे या छुप्या युद्धातील सर्वात धोकादायक शस्त्र असून त्याविरोधातील लढा प्रत्येक नागरिकाने स्वतःचा समजून लढला पाहिजे. ड्रग्सची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱयांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या वेळी नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर आदी उपस्थित होते.





























































