दिल्लीचे अंकल आणि नवीन बाबू यांनी तुमचे पैसे लुटले; राहुल गांधी यांची मोदी सरकारवर सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यात युती आहे. मोदींनी 22-25 अरबपतींचे सरकार चालवले. नवीन बाबूही तेच काम ओडिशात करत आहेत. भारतीय जनता पार्टी आणि बिजू जनता दलाचा विवाह ओदिशात पार पडला. लग्नात त्यांनी ओडिशातील लोकांना PAAN दिले. पा म्हणजे राज्य पांडियन चालवते म्हणजेच पटनायक यांच्या जवळचे आयएएस अधिकारी, ए म्हणजे अमित शहा, एन म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरा एन म्हणजे नवीन पटनायक. या दोघांनी मिळून तुमचा पैसा लुटला. अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. ते आज ओडिशातील केंद्रपाडा येथे प्रचारसभेत बोलत होते.

राहुल गांधी पुढे म्हणाले, खाण घोटाळा 9 लाख कोटी रुपये, जमिनी बळकावल्या, 20 हजार कोटी रुपये तुमचे तिथे गेले आणि प्लॅन्टेशन स्कॅममध्ये तुमचे 15 हजार कोटी रुपये चोरले… आता खूप झाले. खूप पान खाल्ले. पोट खराब झाले आहे. इथे काँग्रेसचे सरकार येईल आणि दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार येईल तेव्हा या लोकांनी जो तुमचा पैसा लुटला आहे तो परत द्यायला सुरुवात करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

भाजपा-आरएसएसला संविधान संपवायचेय

भाजपा आणि आरएसएसला संविधान संपवायचे आहे. जनतेकडून त्यांचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे, परंतु आम्ही असे अजिबात होऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही न्यायासाठी लढत राहू, संविधानाच्या संरक्षणासाठी लढत राहू, असेही त्यांनी दमण आणि दीव येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना सांगितले.

सर्व आरक्षण, संविधानविरोधी भाजपात

सरसंघचालक म्हणाले आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही, पण तेच म्हणाले होते की आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहोत. जे आरक्षणाच्या विरोधात आहेत, संविधानाच्या विरोधात आहेत ते सर्वच्या सर्व भाजपात जात आहेत आणि आता म्हणत आहेत आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही. केवळ 20-22 अरबपतींचे सरकार चालवणे हेच यांचे ध्येय आहे, असे राहुल गांधी म्हणाले.