केंद्र सरकारच्या ‘हर घर नल से जल’ या योजनेचे आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघातच धिंडवडे, काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने हर घर नल से जल ही योजना सुरू केली, मात्र आजही देशभरातली अनेक खेड्यापाड्यांमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. नळ तर दूर साधं गावातील बोरिंगला देखील पाणी येत नसल्याची परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यातील ‘देवनाळा पोड’ या आदिवासी भागात आहे. विशेष म्हणजे हा परिसर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मतदारसंघात येतो. त्यावरून महाराष्ट्र काँग्रेसने मोदी सरकार व भाजपच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसने यवतमाळ जिल्ह्यातील ‘देवनाळा पोड’या आदिवासी गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात गावातील महिला बोरिंगवर पाणी भरायला आलेल्या दिसत आहे. मात्र बोरिंगला पाणीच येत नसल्याने महिलांना त्यांची पाण्याची भांडी घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या व्हिडीओसोबत काँग्रेसने एक पोस्ट शेअर करत भाजपवर निशाणा साधला.

”मोदी सरकारचा १२ वर्षांचा विकास बघा; आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघातच पाण्यासाठी हाल! केंद्र सरकारच्या “हर घर नल से जल” या महत्त्वाकांक्षी योजनेच्या दाव्यांचे यवतमाळ जिल्ह्यात पुरते धिंडवडे निघाले आहेत. स्वतः आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मतदारसंघातील ‘देवनाळा पोड’ या आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी तीव्र हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गेल्या १२ वर्षांत देशात गतीने विकास होत असल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात, आदिवासी समाजाला मूलभूत हक्काच्या पाण्यासाठीही वणवण फिरावे लागत आहे. मंत्र्यांच्याच मतदारसंघाची जर ही परिस्थिती असेल, तर देशातील दुर्गम भागातील वास्तव किती भयानक असेल, याची प्रचिती यावरून येते.