…त्यामुळेच मला भाजपपासून वेगळे व्हावे लागले; एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली खंत

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपत वारंवार झालेल्या अपमानबद्दल खुलासा केला. तसेच काही जणांमुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला, अशी खंतही व्यक्त केली. आजपर्यंत आपण भाजपवर कधीही टीका केली नाही. जो पक्ष मी वाढवला, त्या पक्षाला नालायक म्हणणे, या मानसिकतेचा मी नाही. पण, पक्षातील काही लोकांमुळे मला भाजप सोडावा लागला, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी पक्षात झालेल्या अपमानाबाबत वक्तव्य केले. मला अशाप्रकारे अपमानित केले जायचे की, ज्यामुळे मेल्यासारखेच वाटायचे, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता भाजप सोडण्यासाठी काही लोकं कारणीभूत होती, त्यांच्यामुळेच मी भाजप सोडल्याचे त्यांनी सांगितले. आपली पक्ष सोडण्याची इच्छा नाही, असे मी अनेकदा जाहीर भाषणातून बोलून दाखवले होते. मात्र, काही लोकांमुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला, असेही ते म्हणाले. ‘मला भाजपबाबत कधी द्वेष नव्हता, किंवा आजपर्यंत मी भाजपवर कधीच आरोप केले नाहीत. मी जो पक्ष वाढवला त्या पक्षाला नालायक म्हणा, अशी माझी मानसिकता कधीच होणार नाही. पण, काही व्यक्तींविषयी माझा आक्षेप होता. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे छोटे-मोठे अनुयायी, गिरीश महाजन यांच्यासारख्यांनी मला टार्गेट करुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मला भाजपमधून वेगळे व्हावे लागले,’ अशी खंतही खडसे यांनी व्यक्त केली.

भाजपत असताना मला कोअर कमिटीतून बाहेर काढले, मुख्य समितीतून बाहेर काढले, निवड समितीतून बाहेर काढले. बैठकांना मी उपस्थित असताना मला सांगितले जायचे की, तुम्हाला बैठकांना आमंत्रण नाही, हे सांगणं म्हणजे मला तर मेल्यासारखे व्हायचे, हे सांगून एकनाथ खडसेंनी भाजपात सर्वाधिक अपमानित कसे केले गेले, याची माहितीच दिली. हे सर्वजण मला गुरू मानायचे, माझ्याजवळ राहायचे ते मला म्हणायचे की तुम्हाला या बैठकीचं निमंत्रण नाही. म्हणजे जाणीवपूर्वक अपमान करायचा आणि मी बाहेर निघावे अशी परिस्थिती निर्माण करायची. मी अनेकदा भाषणांतूनही सांगायचो की माझा वारंवार अपमान होतोय, पण भाजप सोडावे असे मला वाटत नाही. पण, शेवटी मी माणूस आहे, मला टोकाचे छळले गेले, तेव्हा मी पक्षातून बाहेर पडलो, असेही खडसेंनी स्पष्ट केले. मला केवळ आरोपांमुळे काढून टाकता आणि सगळे आरोपवाले पक्षात घेता, ही कुठली निती आणि कुठली नितीमत्ता आहे, असा टोलाही भाजपच्या नेत्यांना खडसेंनी लगावला.