नार्वेकर यांचा निर्णय राजकीय असेल; आमदार अपात्र निकालाबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवली शक्यता

prithviraj-chavan

राज्यात पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे, हे स्पष्ट असूनही ते कोणी मान्य करायला तयार नाहीत, न्यायालयाने सांगूनही विलंब केला जात आहे. न्यायालयाने याबाबतच्या निकालासाठी 10 तारखेची मुदत दिली आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय राजकीय असेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, न्यायालयाने मुदत दिलेली असल्याने नार्वेकर यांना निर्णय घ्यावाच लागेल. ते विधानसभेचे अध्यक्ष असले तरी एका पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णतः राजकीय निर्णय असेल हा माझा विश्वास आहे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काही निर्णय घेईल का ? हे पाहावे लागणार आहे. निवडणुकीचे गणित साधे आहे. 2014 मध्ये भाजपला 31 टक्के तर 2019 मध्ये 37 टक्के मतदान झाले होते. बालकोट प्रकरणामुळे 2019 ला मते वाढली होती. मात्र, आता तसे वातावरण नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राम मंदिराच्या बाबतीत राजीव गांधी यांनीच प्रथम मंदिराचे दरवाजे उघडले होते. मात्र न्यायालयाकडून ज्यांना जमीन मिळेल, त्यांना समर्थन काँग्रेस करेल अशी भूमिका होती, तीच आजही कायम आहे. सध्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभा राहत असून त्याचा आम्हाला आनंद आहे. पण निवडणुकीत रोजगार, महागाई, भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे त्यांची मते 34 टक्केच असणार आहेत. उर्वरित सर्व घटक पक्षांना एकत्रीत करुन 66 टक्के मते खचून एकास एक तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी धोरण निश्चित केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी आमचेच आहेत. पण, अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनाही बरोबर घेतले आहे. वंचित, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही इंडिया आघाडीबरोबरच असणार असून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.