
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 50 टक्के अॅग्रीस्टॅक झाले आहेत. अॅग्रीस्टॅक आणि ई-केवायसी केल्यानंतर खात्यात रक्कम थेट जमा होईल असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
मनुज जिंदल पुढे म्हणाले की, अल्पमुदत पीक कर्ज मुक्तीमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 कालावधीतील कर्जाची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड केलेल्या खात्यांना 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. दोन लाखापेक्षा जास्त पीक कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम प्रथम बॅंकेत भरणे आवश्यक आहे.
2022-23,2023-24, व 2024-25 यापैकी कोणत्याही दोन वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेत केल्यास अशा शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन लाभ मिळणार आहे. कर्ज रक्कम 50 हजार पेक्षा कमी असल्यास परतफेड केलेली रक्कम किंवा किमान पाच हजार रूपये प्रोत्साहनपर मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी उपस्थित होते.



























































