
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केरळममधील तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंवर सोमवारी जोरदार निशाणा साधला. आरएसएसच्या कार्यक्रमाला जायचे असेल तर सर्वात आधी तुम्ही पदाचा राजीनामा द्या, त्यानंतर खुशाला कार्यक्रमाला जा, असे खडेबोल वेणुगोपाल यांनी कुलगुरूंना सुनावले.
शनिवारी तिरुवनंतपूरम येथे आयोजित करण्यात आलेल्या आरएसएसच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाला केरळम विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ आणि मल्याळम विद्यापीठाचे कुलुगरू उपस्थित होते. हे कुलगुरू राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला आरएसएसच्या विचारसरणीशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपसुद्धा वेणुगोपाल यांनी केला आहे. या कुलगुरूंनी तटस्थतेचा केवळ मुखवटा परिधान करून राहण्यापेक्षा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले.
अन्यथा आंदोलन करू
कुलगुरूंनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर घटनात्मक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या जनतेकडून त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वेणूगोपाल यांनी दिला.



























































