
स्मार्ट मीटर लावल्यानंतर सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना विजेची भरमसाट बिले येऊ लागली आहेत. त्यामुळे सर्वत्र प्रचंड संताप निर्माण झाला आहे. स्मार्ट मीटर प्रकल्प तातडीने स्थगित करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. स्मार्ट मीटर प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर जनतेला मिळालेली प्रचंड वाढीव वीज बिले आणि त्यासोबत आकारण्यात आलेला थकीत दंड यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, असे सांगतानाच, गोवा राज्याप्रमाणेच या स्मार्ट मीटर मोहिमेला स्थगिती द्यावी आणि वाढीव बिलांची व अन्यायी दंडाची प्रकरणनिहाय तपासणी करावी, असे निवेदन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.






























































