सामना अग्रलेख – बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी… दोन वांझ भाषणे!

आयुष्यभर ज्या संस्थेत, ज्या नेत्यांबरोबर राहिलो तिला क्षणात सोडणे हा व्यभिचार आहे, पण अशा व्यभिचाऱ्यांची मोट बांधून त्यास कूटनीती, बेरजेचे राजकारण वगैरे मुलामा देणे हे राजकारण नसून एक राष्ट्रीय संकट आहे. देवेंद्र फडणवीस आता याच कूटनीती आणि धर्म-अधर्माची भाषा करू लागले आहेत. पण ते व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहेत. तिकडे मुख्यमंत्री शिंदेही आपल्या मिंध्या कार्यकर्त्यांना म्हणाले, राष्ट्रवादीचे सोबत येणे हे बेरजेचे राजकारण आहे. माणसाला गजकर्ण झाले की अशा बेरजा सुचतात. ‘थुंकलेले चाटणे’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. बेरजेचे राजकारण वगैरे वल्गना करणाऱ्यांनी त्याचा अर्थ समजून घ्यावा.

देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी महाराष्ट्रात वजन होते. त्यांचे बोलणे काही प्रमाणात गांभीर्याने घेतले जात होते. त्यांचे चित्त तेव्हा स्थिर होते. मनही शांत होते, पण 2019 सालापासून त्यांची मनःशांती, संयम वगैरे साफ ढळला आहे. ठाणे जिल्हय़ात काल दोन भाषणे झाली. दोन्ही भाषणांत ढोंग व खोटेपणाचा ‘कूट’ होता. त्यातील एक भाषण श्री. फडणवीस यांचे होते. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले की, ‘सध्या राष्ट्रवादी काँग्रेसशी म्हणजे अजित पवार गटाशी झालेली युती ही कूटनीती आहे, अधर्म नव्हे.’ भगवान श्रीकृष्णासारखी कूटनीती राजकारणात वापरावी लागते, असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांना झाले आहे तरी काय? मुख्यमंत्री मिंधे यांच्या संगतीत आल्यापासून त्यांनी सत्य व नीतिमत्तेची कास सोडली आहे. त्यांना जुने काही आठवत नाही असेच एकंदरीत दिसत आहे. इकडे फडणवीस कार्यकर्त्यांसमोर बोलले. त्याच वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मिंध्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केले व सांगितले, ‘राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झालो हे आपले बेरजेचे राजकारण आहे.’ शिंदे-फडणवीस या जोडीचे डोके ठिकाणावर नाही व दोघांना ठाण्यातल्या मानसोपचार इस्पितळातील उपचाराची गरज आहे. फडणवीस हे अलीकडे वारंवार दुतोंडीपणा करीत आहेत. राजकारणात कोणताच पक्ष हा कायमचा अस्पृश्य नसतो असे म्हणतात, पण ‘एकवेळ मी अविवाहित राहीन, पण राष्ट्रवादीशी कदापि युती करणार नाही,’ हा ‘ठेका’ फडणवीस यांनी अलीकडेच धरला होता. आज त्याच

राष्ट्रवादीसोबत

त्यांनी ‘फेर’ धरला आहे. तेही ठीक आहे, पण त्यांनी कूटनीती म्हणून राष्ट्रवादीशी युती केली व त्यासाठी भगवान श्रीकृष्णाची साक्ष काढली, हे अतिच झाले. मग हीच कूटनीती 2019 साली शिवसेनेने केली तेव्हा आजचे हे दुतोंडी साप का जहर ओकत होते? तुम्ही करता ती कूटनीती व दुसऱ्यांनी केली की ती अनीती, हे कसले धोरण? अजित पवार, भुजबळ, हसन मुश्रीफ वगैरे लोकांना चक्की पिसायला लावण्याची भाषा तुम्हीच केली. मग आता श्रीकृष्णाने तुमच्या हाती असे कोणते सुदर्शन चक्र दिले, की त्यांचे सर्व गुन्हे माफ करून ‘धर्म’ म्हणून तुम्ही त्यांना सत्तेत सहभागी केले? श्रीकृष्णाने कौरवांना राज्य मिळू नये यासाठी कूटनीती आखली. देवेंद्र वगैरेंनी महाराष्ट्रात कौरवांचेच राज्य आणले व त्यास ते कूटनीती म्हणत आहेत. हा भगवान श्रीकृष्णांनाच खोटे ठरविण्याचा प्रकार आहे. भाजपवाले इतिहास बदलायला निघाले आहेत, पण इथे तर रामायण, महाभारतही बदलत आहेत. शिंदे, भुजबळ, अजित पवार वगैरे लोकांना कोणतीही तात्त्विक विचारप्रणाली नाही. आपले गुन्हे धुण्यासाठी, आर्थिक साम्राज्य टिकविण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात राहायचे हा काही मौलिक विचार होत नाही. ती सत्तेपुढे शरणागती ठरते. पण ही शरणागती भुजबळ, शिंदे, पवारांनी पत्करली असे म्हणण्यापेक्षा संघाच्या शिलेदारांनी स्वीकारली. महाराष्ट्रात त्यांनी आजपर्यंत जे कमावले ते सर्व कवडीमोल ठरले. आपले गुन्हे झाकण्यासाठी, संपत्ती टिकविण्यासाठी लोक वारंवार पक्ष बदलत आहेत व त्यांना भाजप बळ देत आहे. आयुष्यभर ज्या संस्थेत, ज्या नेत्यांबरोबर राहिलो तिला क्षणात सोडणे हा

व्यभिचार

आहे, पण अशा व्यभिचाऱ्यांची मोट बांधून त्यास कूटनीती, बेरजेचे राजकारण वगैरे मुलामा देणे हे राजकारण नसून एक राष्ट्रीय संकट आहे. देवेंद्र फडणवीस आता याच कूटनीती आणि धर्म-अधर्माची भाषा करू लागले आहेत, पण ते व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहेत. म्हणजे अधर्माच्या चिखलात आहेत याची जाणीव त्यांना आहे. फडणवीसांनी ‘धर्मवीर’ अमितभाई शहांचा हवाला देऊन कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘ते मला म्हणाले, देवेंद्र, राजकारणात 10 वेळा अपमान सहन कर, पण बेइमानी खपवून घेऊ नको.’ मुळात देशात गेल्या 8-9 वर्षांत ‘इमान’ नावाची चीज गुंजभर तरी उरली आहे काय? इमानाचे पानिपत दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत रोजच चालू आहे. ‘हम छेडते नही, छेडा तो छोडते नही.’ असा शेर श्री. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर मारला व टाळय़ा मिळवल्या. तुम्ही टाळय़ा मिळवा किंवा टाळ कुटा, पण राजकारण सत्य व धर्माचे करा. ईडी, सी.बी.आय. वगैरे चिलखते बाजूला करा व नंतर ही असली संवादफेक करा. मग तुम्हाला अधर्म, कूटनीती, छेडणे वगैरेचे प्रत्यंतर खऱ्या अर्थाने येईल. तिकडे मुख्यमंत्री शिंदेही आपल्या मिंध्या कार्यकर्त्यांना म्हणाले, राष्ट्रवादीचे सोबत येणे हे बेरजेचे राजकारण आहे. माणसाला गजकर्ण झाले की अशा बेरजा सुचतात. ‘थुंकलेले चाटणे’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. बेरजेचे राजकारण वगैरे वल्गना करणाऱ्यांनी त्याचा अर्थ समजून घ्यावा.