जालन्यात जमिनीच्या वादातून “वंचित”च्या पदाधिकाऱ्याची हत्या

जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव (33) यांची हत्या करण्यात आली आहे. जालन्यातील रामनगर शिवारात शनिवारी रात्री ही घटना घडली. संतोष आढाव यांचे चुलते निवृत्ती आढाव यांच्यामध्ये रामनगर शिवारातील गायरान जमिनीचा वाद सुरू होता. या वादातून शनिवारी रात्री संतोष आढाव यांच्यासह त्यांचा भाऊ संजय आढाव आणि सिद्धार्थ मगरे यांच्यावर रात्री चुलत्यासह पाच जणांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि दगडांनी हल्ला केला. यावेळी झालेल्या बेदम मारहाणीत संतोष आढाव हे जागीच ठार झाले आहेत.

त्यांच्यासोबत असणारे भाऊ संजय आढाव आणि सिद्धार्थ मगरे (मंजरेवाडी) हे दोघे या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे, राकेश नेटके यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात संतोष आढाव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून निवृत्ती पाराजी आढाव यास ताब्यात घेतले आहे. जखमी संजय आढाव यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती आढाव, त्याचा मुलगा योगेश आढाव, वंदना आढाव, दीपक जाधव आणि चुलत बहीण स्वाती हिचा नवरा, या पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.