
नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात उसळलेली हिंसा आता देशातील इतर शहरांमध्येही पसरली आहे. गेल्या चार दिवसांत विविध भागात जाळपोळ, दगडफेक, तोडफोड आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तसेच संवेदनशील भागांमध्ये गस्त घालण्यासाठी आणि हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवण्यासाठी नेपाळ लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
आज तकने प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, देवानगंज येथे बोल बम यात्रेदरम्यान हिंदू भाविक आणि स्थानिक मुस्लीम समाजातील काही गटांमध्ये वाद निर्माण झाला. मंदिराच्या सार्वजनिक जागेवर मोहरमच्या निमित्ताने लावण्यात आलेला झेंडा हटवण्यावरून हा तणाव सुरू होता. अनेकदा विनंती करूनही झेंडा हटवला गेला नाही. रविवारी रात्री याच मैदानावरून कावड यात्रा सुरू होत असताना कावडियांवर अचानक हल्ला झाला, ज्यामुळे या वादाला हिंसक वळण लागले.
या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार आणि दगडफेकीत आंदोलक, स्थानिक नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक लोक जखमी झाले आहेत. ठिकठिकाणी सरकारी आणि खाजगी मालमत्तेचे अतोनात नुकसान करण्यात आले असून, जमावाने डझनभर वाहने आणि दुकाने पेटवून दिली आहेत.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या तणावामुळे नेपाळमधील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे. नागरिक भीतीच्या छायेत असून त्यांना घरातच राहावे लागत आहे. व्यावसायिक उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे. आता सरकार आणि सुरक्षा यंत्रणा परिस्थिती किती लवकर नियंत्रणात आणतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.




























































