18 सप्टेंबरपर्यंत यलो अ‍ॅलर्ट, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 97 टक्के पाणीसाठा

ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्याच्या अनेक भागात पावसाचे पुनरागमन झालेले पाहायला मिळाले आहे. येत्या 18 सप्टेंबरपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अ‍ॅलर्ट तर ठाणे पालघरसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरू दे आणि पाऊस पडू दे अशी प्रार्थना मुंबई, ठाणे आणि पालघरातील नागरीक करत आहेत. मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाही. धरण क्षेत्रात गेले काही दिवस पावसाची संततधार पाहायला मिळाली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सगळ्या धरणांमध्ये सध्याच्या घडीला 97 टक्के पाणीसाठा आहे.

गुरुवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये चांगला पाऊस झाला होता. पावसाचे प्रमाण येत्या काही दिवसांत वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत पावसाची रिमझिम पाहायला मिळत होती. येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दमदार पाऊस झाला तर पुढील वर्षभराचे मुंबईवरील पिण्याच्या पाण्याचे संकट टळू शकेल. कारण चांगला पाऊस झाला तर कोणत्याही क्षणी धरणे पूर्ण क्षमतेने वाहू लागतील. गेल्या वर्षी याच दिवशी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 14.28 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. आज या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असून तो 14.08 लाख दशलक्ष लिटर इतका आहे. 1ऑक्टोबरपर्यंत धरणांनी 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीपातळी गाठली नाही तर मुंबईवर पाणी कपातीचे संकट ओढावू शकते.

मुंबई खराब हवामानामुळे लॅण्डिंग करताना विमान कोसळलं

मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता यामुळे खासगी चार्टर्ड विमान 27 नंबरच्या मुख्य धावपट्टीवरून कोसळल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास घडली. विमानाचा वेग इतका होता की, कोसळल्यानंतर विमानाचे अक्षरशः तीन तुकडे झाले आणि क्षणार्धात विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांसह एकूण आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हीएसआर एव्हीएशनचे लियरजेट एअरक्राफ्ट 45 व्हीटी-डीबीएल हे विशाखापट्टणमच्या विझाग येथून मुंबईला आलेले विमान धावपट्टीवरून कोसळले. दुर्घटना घडली त्यावेळी केवळ 700 मीटरपर्यंतची दृश्यमानता होती. त्याहून दूरवरचे काहीच दिसत नव्हते. विमान धावपट्टीवर उतरल्यानतंर प्रचंड वेगाने पुढे सरकले आणि दुर्घटना घडली.

विमानाने पेट घेतल्यानंतर तत्काळ विमानतळावर तैनात अग्निशमन दलाचे बंब आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले आणि गंभीर जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

लीयरजेट 45 या प्रकरातील हे विमानअसून व्हीएसआर व्हेन्चर प्रायव्हेट लिमिटेड ही पंपनी चार्टर्ड विमानसेवा उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. व्हीएसआर व्हेन्चर ही कंपनी नवी दिल्ली, मुंबई, हैद्राबाद आणि भोपाळ या शहरांमध्ये एअरअम्ब्युलन्सदेखील उपलब्ध करून देते.

मुसळधार पाऊस, निसरडी धावपट्टी, कमी दृश्यमानता त्यात विमानाचा प्रचंड वेग यामुळे विमान कोसळले. मोठा आवाज होऊन  विमानाचे तीन तुकडे झाले आणि विमानाने पेट घेतला.

विमानात जेएम बक्सी पोर्ट्स अँड लॉजिस्टीकचे एमडी ध्रुव कोटक, कु अ‍ॅपचे अध्यक्ष के. के. क्रीशनदास, आकर्ष सेठी, अरुल सली, कामाक्षी, लार्स सोरेन्सन, वैमानिक सुनील, नील होते.

विमानसेवा अडीच तास ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्टय़ा अडीच तास बंद होत्या. पावणेआठच्या सुमारास विमानाचे अवशेष दूर करण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या दरम्यान मुंबई विमानतळावर उतरण्याचे नियोजन असलेली सर्व विमानोड्डाणे अन्यत्र वळवण्यात आली तर मुंबईतून निघणारी 40 विमाने रखडली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.