
मास्टर गाठण्याच्या धावपळीत तुम्ही बिनधास्तपणे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवेश करीत असाल तर सावधान.. तुमच्या हातातील मोबाईल किंवा खिशातील पाकीट कधीही ‘गायब’ होऊ शकते. कारण स्टेशनवर चोरट्यांच्या, पाकीटमारांच्या घिरट्या वाढत चालल्या असून तीन दिवसांत तीन चोऱ्या झाल्या आहेत. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत असले तरी तुमचा खिसा, पाकीट, मोबाईल मात्र नीट सांभाळा.
ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. बोलण्यात गुंग, प्रवासी झोपलेल्याचा आणि गर्दीचा फायदा घेत चोरटे थेट हात की सफाई करत आहेत. मीरा रोड येथील नजमा मोहम्मद हसनैन जैदी या लातूरहून येत असताना त्यांच्या बॅगेतून पर्स चोरीला गेली. यामध्ये मंगळसूत्र, घड्याळ, आधार, पॅन, मतदान ओळखपत्रासह इतर महत्त्वाची कागदपत्रे आणि ८ हजार रुपयांची रोकड असा २१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला.
सावधगिरी बाळगा
अहिल्यानगर येथून आलेल्या उल्हास आवारे हे पहाटे झोपेत असताना चोरट्याने त्याची चक्क बॅग लांबवली. कपडे, स्मार्ट वॉच आणि कागदपत्रेही पळवली. ठाणे पूर्व येथील वैभव वनकुद्रे हे स्लो लोकलने प्रवास असताना त्यांची बॅग गायब झाली. चोरांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रोज प्रवास करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.





























































