
पुण्यातील औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे असे विधान शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच राजकारण बाजूला ठेवून सरकारने लक्ष दिलं तर नोकऱ्या आणि उद्योगधंदे वाचवता येतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पुण्यात हिंजवडीतील औद्योगिक क्षेत्रातील स्थानिक नागरिकांशी भेटून चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, चाकणमध्ये रस्त्यांचे हाल असतील किंवा पाण्याचे हाल असतील. वीज सतत खंडित होते. अनेकांनी मला हिंजवडीतल्या प्रश्नांबाबत माहिती दिली. साडे पाच ते सहा लाख हे हिंजवडीतील आयटी क्षेत्रावर अवलंबून आहेत. जवळपास 15 लाख या क्षेत्राशी अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या तक्रारी समोर येत आहेत. आम्हाला वाटलं यावर काही तोडगा काढला जाईल. पण जेव्हा मी इथल्या लोकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की चालायला फूटपाथच नाही. मेट्रोची कामं सुरू आहेत आणि काही स्थानकांची चाचणी सुरू आहे एवढं कळालंय. आणि त्या स्थानकांच्या उद्घाटनाची तारीख समोर येत नाहिये. तिसरी बाब म्हणजे काही सोसायट्यांमध्ये गॅसची पाईपलाईन आहे काही सोसाट्यांमध्ये नाहिये. अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाहिये. काही ठिकाणी एक रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा, एक रस्ता PMRDA चा आणि तिसरा रस्ता पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा. एवढा गोंधळ या चाकण MIDC परिसराचा आहे. गेल्या तीन चार वर्षात एकही नवीन कंपनी आलेली नाही. हिंजवडीच्या Phase 1 वरून Phase 3 पर्यंत जायला एक ते दीड तास लागत असेल या भागात आपण का थांबायचं की दुसरीकडे स्थलांतरित व्हायचं असा प्रश्न इथल्या इंडस्ट्रीला पडला आहे. काही संघटना या मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना भेटल्या होत्या. या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. वाहतूक पोलीसांना अधिक बळ देण्याची गरज आहे, जेणेकरून ही वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल. आयटी क्षेत्रात स्मार्ट सिग्नलिंग आलं पाहिजे. रस्त्याचे हाल आपण पाहतोय, अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. याकडे सरकारने लक्ष दिलं तर स्थानिक नागिरिकांना मोठा दिलासा मिळेल. जागतिक स्तरावर जेव्हा आपण एखाद्या उद्योग आणायला जातो तेव्हा आपण Eas of Doing Business म्हणतो. असं असलं तरी अनुपालन, भ्रष्टाचार Infrastructure Collapse चे विषय आहेत. त्यावर राज्य शासनाने थोडं लक्ष केंद्रित करावं. राजकारण बाजूला ठेवून इथे सरकारने लक्ष दिलं तर इथल्या नोकऱ्या आणि उद्योगधंदे वाचवता येतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


































































