तू आरोप कर मी क्लीन चिट देतो, पदही कायम ठेवतो! फडणवीसांनी परमवीर सिंहांना सांगितल्याचा अनिल देशमुख यांचा आरोप

आमचे लोक भाजपसोबत गेले कारण त्यांना ईडीची भीती होती. भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले. मात्र, भाजपवाले अशा फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे प्रश्न विसरून गेले. परमवीर सिंह यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, तू अनिल देशमुख यांच्यावर आरोप कर. आम्ही तुला क्लीन चिट देऊ. त्यानंतर तुझे पदही तुला देऊ. त्यामुळे खोटया आरोपांमुळे माझ्यावर कारवाई झाली, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी भर प्रचारसभेत केला.

वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज सभा झाली. त्यावेळी त्यांनी हे गंभीर आरोप केले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते.

तर आपलं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही

जर आपण योग्य उमेदवाराला निवडून दिले नाही तर खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. दिल्ली ही देशाची राजधानी आहे त्याचा चेहरा मोहरा बदलण्याची कामगिरी ज्यांनी केली त्या केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले आहे. हुकूमशाही देशात पह्फावत आहे, जर योग्य वेळी याला थांबवलं नाही तर आपलं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.