अनुज थापन याची हत्याच, कुटुंबियांचा आरोप; अनेक प्रश्न केले उपस्थित

सुपरस्टार सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनुज थापन याचा मृत्यू संशयास्पद असून तो आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्याच झाली आहे, असा आरोप थापन याच्या कुटुंबियांनी केला आहे

 सलमान खान गोळीबार प्रकरणात अनेक ट्वीस्ट आणि टर्न येत आहेत. त्याने पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे गुढ आणखी वाढत चालले आहे. मात्र, थापनच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्यावर दबाव आणून त्याची हत्या केल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलिस कोठडीत जर पैद्याचा मृत्यू झाला तर याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला जातो. कारण, तपासाच्या कक्षेत केवळ पोलिसच येतात. मुंबईत पोलिस कोठडीत थापन याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे याप्रकरणाचा तपासही सीआयडीकडेच सोपवला जाऊ शकतो.

काय म्हणणे आहे थापनच्या घरच्यांचे

अनुजचा मृत्यू नेमका कसा झाला याचा सखोल तपास व्हायला पाहिजे अशी त्याच्या कुटुंबियांची मागणी आहे. अनुजच्या गावातील सरपंच मनोज गोदारा यांनीही याप्रकरणात अनुजवर मुंबई पोलिसांचा दबाव असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनीही त्याचा बळी घेतला असून हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे दाखवल्याचा आरोप त्यांनी आणि अनुजच्या कुटुंबियांनी केला आहे.

अनुजने गळफासच घेतला; मुंबई पोलिसांचा दावा

अनुज थापन याचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अनुज गुन्हे शाखेच्या कोठडीतील शौचालयात आश्चर्यकारकरित्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर गुरुवारी अनुजच्या मृतदेहाचे जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अनुजच्या गळ्याभोवती गळफास घेतल्याच्या खुणा आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.