महाराष्ट्र शरीरसौष्ठवाची ताकद खानविलकरांच्या हाती; अध्यक्षपदी लांडगे तर कार्याध्यक्षपदी मोरेंची पुनर्निवड

महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाला आणि शरीरसौष्ठवपटूंना आर्थिक आणि शारीरिक बळ देण्यासाठी अजय नंदू खानविलकरांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच आमदार महेश लांडगे यांची अध्यक्षपदी तर डॉ. संजय मोरे यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध पुनर्निवड झाली आहे.

नुकतीच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाची मान्यता असलेल्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघनटेची निवडणूक बिनविरोध पार पडली. गेले अनेक वर्षे महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाला बळकटी देणारे आमदार महेश लांडगे अध्यक्षपदी पुन्हा विराजमान झाले आहेत. तर हिंदुस्थानातील शरीरसौष्ठवाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देणार्‍या डॉ. संजय मोरे यांना बिनविरोध कार्याध्यक्षपदी मान देण्यात आला आहे. मुंबई शरीरसौष्ठवाला हिंदुस्थानातील सर्वात बलशाली जिल्हा संघटना बनविणार्‍या अजय खानविलकरांचा अनुभव आता राज्य संघटनेलाही लाभणार असून त्यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. तसेच मुंबईचे सर्वात धडाडीचे कार्यकर्ते असलेल्या सुनील शेगडे यांच्याकडे राज्य संघटनेच्या तिजोरीची किल्ली देण्यात आली आहे. मुंबईकर मनोहर पांचाळ (उपाध्यक्ष), मंदार आगवणकर, राम नलावडे, राजेश निकम आणि मदन कडू (सर्व संयोजक सचिव) यांचीही राज्य संघटनेत निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी अ‍ॅड. अविनाश औटी यांनी या निवडणूकीचे काम पाहिले.

राज्याच्या शरीरसौष्ठवाला आर्थिक श्रीमंती देणार; अजय खानविलकर यांचे ध्येय
देशातील सर्वात बलशाली राज्य संघटना असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघटनेलाच नव्हे तर त्या संघटनेशी संलग्न जिल्हा संघटना आणि खेळाडूंना बलशाली नव्हे तर आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. नवनियुक्त सरचिटणीस अजय खानविलकर यांनी. पदभार स्वीकारताच खानविलकर यांनी खेळ आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी नवनव्या योजना अमलात आणणार असल्याचे सांगितले.

शरीरसौष्ठवाचा कणा असलेल्या मुंबई शरीरसौष्ठवाला सर्वदृष्टीने बलशाली बनवण्याचे ध्येय खानविलकर यांनी नुसते बाळगले नसून ते कामालाही लागले आहेत. हल्ली सर्वच क्षेत्रात खेळाडूंची मानसिकता खचत चालली आहे. अपेक्षित आणि झटपट यश लाभले नाही तर खेळाडू आपला मार्ग बदलत आहेत. त्यांची मानसिकता बदलावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून प्रथमच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

गेले अनेक वर्षे रखडलेली कामे पूर्ण करण्याचा ध्यास खानविलकर आणि सावंत यांनी घेतला असून खेळाडूंचा उत्कर्ष कसा होईल, यासाठी नव्या संकल्पना अमलात आणल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही आमच्या कल्पना टप्प्याटप्प्याने सर्वांसमोर आणूच. आम्हाला नुसती आश्वासने द्यायची नसून काही ठोस करून दाखवायचे आहे. मुंबई जिल्हा संघटनाही अवघ्या भारतात सर्वात बलवान आहे. तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्हा संघटना आणि आघाडीच्या शेकडो खेळाडूंना शरीराप्रमाणे आर्थिकदृष्टया श्रीमंत करायचे आहे. आमचे ध्येय खडतर आहे आणि ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वासही खानविलकरांनी बोलून दाखविला.