भाजपने 10 वर्षांत कसे फसविले, रडविले याची आठवण ठेवा; राष्ट्रवादीचे प्रतीक पाटील यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूक तुमच्या-माझ्या अस्तित्वाची आणि देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. गाफील राहू नका. सत्ताधारी भाजपाने गेल्या 10 वर्षांत आपल्याला कसे फसविले, रडविले, याची आठवण ठेवा. भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना संसदेत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते प्रतीक पाटील यांनी केले.

हातकणंगले लोकसभा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रचारार्थ वाळवा येथे झालेल्या सभेत प्रतीक पाटील बोलत होते. यावेळी राजेंद्र पाटील, नेताजीराव पाटील, प्रशांत थोरात, हर्षवर्धन पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, संग्राम जाधव, देवराज देशमुख, शिवसेनेचे शकील सय्यद, अलका राजे, योजना पाटील, मानव गवंडी, रंजना पवार, अनिता जंगम, फजल हवलदार उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्यजित पाटील (आबा) व प्रतीक पाटील यांचे तुतारीच्या निनादात जोरदार स्वागत केले.

प्रतीक पाटील म्हणाले, प्रत्येक कुटुंबाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकू, दरवर्षी देशातील 2 कोटी युवकांना नोकऱया देऊ, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करू, 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर देऊ, या भाजपाच्या आश्वासनांचे काय झाले? त्यांनी देशातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी किती उद्योग देशात आणले ते सांगावेत. भाजप नेत्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मोठी तफावत आहे, त्याला फसू नका, असे आवाहन त्यांनी केले.

सत्यजित पाटील (आबा) म्हणाले, माझ्या विजयात आपला मोठा वाटा असणार आहे. मीही तुम्हाला निराश करणार नाही. खासदारकीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावू.

यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक जयकर गावडे, राजेंद्र औंधकर, पै. किसन गावडे, जालिंदर थोरात, संदीप धनवडे, विकास अहीर, मीनाताई पाटील, वर्धमान मगदूम, मोहसीन लांडगे, प्रकाश मगदूम, अनिल थोरात, शेखरबापू शेळके उपस्थित होते.