नववर्षात शरद पवार यांच्या ‘या’ अपेक्षा; अर्थकारण, शेती याबाबतही केले मत व्यक्त

2022 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. या दिवशी सरत्या वर्षाने काय दिले यावर नजर टाकत नवीन वर्षाचे विविध संकल्प करण्यात येतात. तसेच नवीन वर्षातील अपेक्षाही अनेकजण व्यक्त करतात. जगभरात नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. नवीन वर्षाबाबत अनेक मान्यवरांनीही आपल्या आशा, अपेक्षा व्यक्त केल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनीही नवीन वर्षातील त्यांच्या अपेक्षा व्यक्त करत देशाचे अर्थकारण आणि शेती याबाबतही मत व्यक्त केले आहे.

2022 या वर्षात काही प्रश्न मार्गी लागले. काही चांगल्या गोष्टी घडल्या. जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली. आता आपण यातून मुक्त झालो आहोत. आता 2023 वर्ष सुरु होईल. जगभरात नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत होत आहे. नववर्ष नव्या आशा, आकांक्षांचे असेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

देशातील 56 ते 60 टक्के लोक शेती करत आहेत. पाऊस चांगला झाला तर येणारे वर्ष चांगले जाईल. शेती चांगली झाली तर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढणे हे व्यापार उद्योगाला चांगले दिवस आणते. बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात. सुदैवाने मागील वर्ष ठीक गेले.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देश महत्त्वाचा निर्यातदार होऊ शकतो. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणा व्हायला हव्यात. सत्तेत कोणीही असले तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावे लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे. येत्या वर्षात त्याला सामोरे जाऊया. नव्या उमेदीने नव्या उत्साहाने नव्या वर्षाचे स्वागत करूया, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे. विरोधी पक्षातील काही सदस्य आतमध्ये आहे. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्याय देवतेने काढला आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.