शासन आपल्या दारी… खर्च सामान्यांच्या माथ्यावरी! परळीत दोन कोटींपेक्षा जास्त उधळपट्टी

मिंधे सरकारकडून शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर कोटय़वधी रुपये उधळले जात आहेत. पुढचा कार्यक्रम बीडच्या परळीत होणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिंधे सरकारवर टीका केली आहे. शासन आपल्या दारी…खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी असे त्यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्विटरवर ट्विट केले आहे. परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी किती आणि कसा खर्च होणार आहे याची माहिती देण्यासाठी त्यांनी आंबेजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदा सूचनाच ट्विटरवर पोस्ट केली आहे. परळीतील मंडपासाठी जवळपास 2 कोटी 21 लाख 90 हजार 750 रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी 81 लाख 94 हजार 100 रुपये तर साईड मंडपासाठी 60 लाख 14 हजार 140 रुपये तर इलेक्ट्रिक कामांसाठी 79 लाख 82 हजार 510 रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली होती. त्या सभेसाठीही भव्य मंडप उभारण्यात आला होता. त्या मंडपापेक्षाही भव्य मंडप शासन आपल्या दारी उपक्रमासाठी उभारण्यात येणार आहे.