अरे हाय काय अन् नाय काय! ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा रंगभूमीवर येणार…

प्रशांत दामले हे नाव घेतलं की त्यांचे नाटकांचे विक्रम डोळ्यासमोर येतात. 32 नाटकांचे साडेबारा हजारांहून अधिक प्रयोग, एका दिवसाला पाच प्रयोग असे अनेक विक्रम त्यांच्या नावे आहेत. आता त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. कारण ठरलंय ते पुन्हा एक नाटकच.. पण हे नाटक नवीन नसून प्रेक्षकांनी गौरवलेलं गेला माधव कुणीकडे हे नाटक आहे.

‘अरे हाय काय अन् नाय काय’… असं म्हणत प्रशांत दामले यांनी माधव या रुपात रंगभूमीवर धुमाकूळ घातला होता. 7 डिसेंबर 1992 ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर 1802 प्रयोग झाले. एकेकाळी हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवणारं नाटक एकाएकी रंगभूमीवरून दिसेनासं झालं.

पण, आता प्रेक्षकांना गेला माधव कुणीकडे असं विचारण्याची वेळ येणार नाही. ‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा ‘अरे हाय काय अन् नाय काय’ हा संवाद आजही चांगलाच लोकप्रिय आहे.

मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ‘ब्रेक’ घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा शुभारंभ 15 जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी 4 वा. होणार आहे. तिकीट विक्रीचा शुभारंभ 1 जून रोजी फक्त ‘तिकीटालय’अॅप वर सुरु होणार आहे. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.