सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट सारखी भाजपची कार्यपद्धती, संजय राऊतांची टीका

“शिवसेनेतून फुटलेल्या लोकांचा शिवसेना नावावर आणि चिन्हावर दावा करण्याचा विचार नव्हता, नाव आणि चिन्ह चोरण्याचं डोकं दिल्लीच्या भाजपवाल्यांचं आहे. कारण त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव नष्ट करायचं आहे. आता हीच भूमिका त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीच्या बाबतीत अवलंबली आहे. राष्ट्र्रवादी फुटल्यानंतर भाजपवाल्यांनी आता काही लोकांना हाताशी धरून राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हावर दावा करायला लावला आहे. एखाद्या सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट सारखी भाजपची कार्यपद्धती आहे. अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार, संजय राऊत यांनी केली आहे.

जे स्वतः इतिहास घडवू शकत नाहीत ते दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करतात.

“बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि शरद पवार यांचं राजकीय व सामाजिक कार्य नष्ट करायचं. मात्र स्वतः काहीही करायचं नाही. जे स्वतः इतिहास घडवू शकत नाहीत ते दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करतात. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातून हा इतिहास पुसला जाणार नाही. शिवसेनेने कायदेशीर लढाई जिंकलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार महाराष्ट्रातील फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल. हाच निकाल राष्ट्रवादीतून फुटलेल्या गटालाही १०० टक्के लागू पडू शकतो. विधिमंडळ पक्ष म्हणजे मुख्य पक्ष होत नाही हे धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी राष्ट्रवादी आणि शिवसेना जागेवरच राहतील.” असे राऊत म्हणाले.

भविष्यात तुमच्यावरही ही वेळ येईल.

“शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे भाजपचं देशभरात वस्त्रहरण झालं आहे. त्यांची वैचारिक सुंता झाली आहे. कालपर्यंत मुलुंडचे पोपटलाल भ्रष्टाचार्यांना तुरुंगात पाठवायच्या गोष्टी करत होते. देवेंद्र फडणवीसही ‘अजित पवार चक्की पीसींग, नवाब मलिक यांच्या कोठडीच्या बाजूला कोण जाणार?’ असे बोलत होते. आता तुम्हाला जेवढ्या उड्या मारायच्या आहेत त्या मारून घ्या भविष्यात तुमच्यावर तिथे जायची वेळ येईल. भ्रष्टाचाराला इतकं खुलं समर्थन आणि प्रतिष्ठा या देशात दुसऱ्या कोणीही दिली नाही. नरेंद्र मोदी २४ तासांपूर्वी काय बोलले आणि २४ तसात काय झालं हे जगातल्या ३३ देशांनी पाहिलं.” असे राऊत म्हणाले.

उद्या निवडणूका जाहीर करा, आमची तयारी आहे.

“फुटलेल्या आमदारांचा काही फायदा होणार की नाही, याचा आत्मविशास आल्यावर कदाचित भाजप निवडणूक लावेल. तुम्ही कितीही लोकं फोडा मुंबई ठाण्याच्या महानगरपालिकांवर शिवसेनेचा भगवाच फडकेल. माझं फडणवीस आणि त्यांनी तयार केलेल्या गटांना आव्हान आहे, आत्ता निवडणूक घ्या. ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या गोष्टी करायला तुम्ही जोतिष आहात का? उद्या निवडणूका जाहीर करा, आमची तयारी आहे.” असे राऊत म्हणाले.

राजभवनात अजित पवारांच्या पायावर डोकं टेकवण्यासाठी रांगा

“शिंदे गट भाजपचा गुलाम आहे. आणि गुलामांच्या नाराजीला किंमत नाही. राष्ट्रवादी सोबत आल्यास आम्ही सत्तेतून बाहेर पडू असे बोलणारी लोक राजभवनात अजित पवारांच्या पायावर डोकं टेकवत होते. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणून ज्यांचा स्वाभिमान उफाळून आला, तेच आमदार व मंत्री रांग लावून अजित पवारांचे चरणस्पर्श करत होते. हे सगळे ढोंगी आणि बोगस राजकारणी आहेत. हे शब्दाला पक्के नाहीत. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून हे अनेक वर्षे कारस्थानं करतायत.” असा आरोप राऊत यांनी केला.