
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात पेपरफुटीविरोधी विधेयक मांडून ते मंजूर करण्यात आले. पेपरफुटी आणि जेन-झी विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेनंतर राज्यसभेतही विरोधकांनी सरकारला घेरले. यादरम्यान पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित एवढ्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही उपस्थित नव्हते, असा आरोप करत संजय राऊत यांनी या प्रकाराला ‘ढोंग’ म्हटले आहे.
दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेतला. ‘परीक्षा सुधारणा विधेयकावर काल राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुख्य भाषणानंतर सर्व विरोधकांनी आपली मते मांडली. हजारो विद्यार्थी या आंदोलनात उतरले होते आणि त्यांनी संसदेवर धडक दिली. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, टीअर गॅस आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याने अनेक मुले गंभीर जखमी झाली. एवढा मोठा प्रश्न असताना नेहमी विद्यार्थी आणि परीक्षांवर बोलणारे पंतप्रधान व गृहमंत्री संसदेत उपस्थित नव्हते. ज्या खात्याचा याविषयात संबंध नाही असे मंत्री उत्तरे देत होते. त्यामुळे विरोधकांना वॉकआऊट करावे लागले, असा शब्दांत संजय राऊत यांनी सरकारला सुनावले.
टीका करायला तास घालवता पण विधेयकावरील चर्चेदरम्यान अनुपस्थित
वंदे मातरम् विषयावर विशेष अधिवेशन घेणाऱ्या पंतप्रधानांनी प्रत्यक्षात विधेयक चर्चेत असताना पाठ फिरवल्याची टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, वंदे मातरम् या विषयावर पंतप्रधानांनी एक विशेष अधिवेशन घेतलं. हे विधेयक जेव्हा सभागृहात चर्चेला आलं तेव्हा पंतप्रधान संसदेत उपस्थित नव्हते. मग हे राष्ट्रभक्तीचं काय ढोंग करताय तुम्ही? तुम्ही वंदे मातरम् वर अख्खं अधिवेशन घेता आणि त्यात काँग्रेसवर टीका करण्यात 1 तास घालवता. जेव्हा विधेयक चर्चेला येत तेव्हा पंतप्रधान, गृहमंत्री दोघेही चर्चेला उपस्थित नसतात. ही गंभीर बाब आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सरकारचा समाचार घेतला.



























































